वडेट्टीवारांचा हल्लाबोल: मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका, जरांगेंच्या मागण्यांवर प्रश्न
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण, यूपीआय शुल्क आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महायुती सरकारला लक्ष्य केले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. यूपीआय व्यवहारांवरील शुल्कापासून मराठा आरक्षणापर्यंत विविध विषयांवर त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून बँका बुडतील अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. यूपीआयद्वारे होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या व्यवहारावर बँका १२ रुपये वसूल करणार असून, व्यापाऱ्यांवर पडणारा हा भार शेवटी सामान्य ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जाईल, असे ते म्हणाले. एक लाखाच्या व्यवहारावर सरकार थेट ६०० रुपये वसूल करणार आहे. ही सामान्य जनतेची उघड फसवणूक असून, गरिबांचे पैसे लुटून उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार जरांगे यांना वारंवार का फसवते आणि जरांगे स्वतः का फसतात, याची समीक्षा होण्याची गरज आहे. जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या, असे त्यांनी नमूद केले. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध नाही, पण हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात, अशी टीका त्यांनी केली. गाड्यांचा ताफा घेऊन ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन केले जात आहे, त्यावरून आपण लोकशाहीत आहोत की राजेशाहीत, असा प्रश्न पडतो, असेही ते म्हणाले. सध्या भावनिक साद घालून भावना भडकावून जे सुरू आहे, त्या आंदोलनाशी ओबीसींचा काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून धानाचे पीकही करपू लागले आहे. या भीषण परिस्थितीवर बोलताना वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विरोधी पक्षनेता असताना फडणवीस पंचनाम्याची वाट न पाहता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करायचे, अशी आठवण त्यांनी करून दिली.
मात्र सत्तेत आल्यानंतर फडणवीस यांची भाषा बदलली असून, आता ते सर्वेक्षण आणि पडताळणीच्याच गप्पा मारत आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. या संकटाच्या काळात केवळ काही नेत्यांनीच नव्हे तर संपूर्ण विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रभर दौरे काढून प्रत्येक जिल्ह्यात सरकारविरोधात तीव्र आंदोलने छेडली जातील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.