गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:14 IST

जरांगेंच्या आझाद मैदान आंदोलनाला पुन्हा नकार, आता हायकोर्टात जाण्याच्या तयारीत

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पुन्हा परवानगी नाकारली असून आता ते हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

जरांगेंच्या आझाद मैदान आंदोलनाला पुन्हा नकार, आता हायकोर्टात जाण्याच्या तयारीत
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज, 15 सप्टेंबर रोजी 18 वा दिवस आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील आपल्या मोजक्या समर्थकांसोबत अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. यापूर्वी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती, त्यानंतर आता जरांगे यांच्या वतीने पोलिसांकडे पुन्हा एकदा नवा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

या नव्या अर्जात फक्त 50 जणांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी घालून दिलेले सगळे नियम आणि अटी पाळल्या जातील, तसेच 18 सप्टेंबर रोजी ठरलेल्या वेळेतच आंदोलन केले जाईल, असेही या अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे. आज दुपारपर्यंत पोलीस या अर्जावर काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी वेळेत निर्णय न घेतल्यास जरांगे पाटील दुपारी कोर्टात अर्ज दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला दुसऱ्यांदा नकार दिल्यानंतर जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याआधी त्यांनी मुंबईत आपण एकट्यानेच उपोषणासाठी जाणार असल्याचे जाहीर केले होते आणि आपल्यासोबत दुसरे कोणीही मुंबईला येणार नसल्याचे म्हटले होते. मुंबई पोलिसांनी कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत परवानगी नाकारली आहे, मात्र आझाद मैदानावरच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. परवानगी न मिळाल्यास हायकोर्टात दाद मागण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

गेल्या वर्षीच्या मराठा आंदोलनाच्या वेळी दक्षिण मुंबईत जवळपास 5 हजार गाड्या अनधिकृतपणे उभ्या राहिल्याने वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला होता, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पोलिसांचा आक्षेप आहे. शिवाय काल, 14 सप्टेंबरपासून मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून या काळात शहरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती संवेदनशील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आझाद मैदानातील सुमारे 7 हजार चौरस मीटर जागेत नियमांनुसार जास्तीत जास्त 5 हजार आंदोलकांना जागा देता येते. पण जरांगे पाटील यांनी मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचे आवाहन केल्याने गर्दी नियंत्रणाबाबत पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत आले, तर दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भागातील जी.टी., कामा, सेंट जॉर्ज आणि बॉम्बे हॉस्पिटलसारखी रुग्णालये, कोर्ट तसेच आर्थिक केंद्रांच्या कामकाजावरही याचा परिणाम होऊ शकतो, अशी प्रशासनाला भीती आहे. आता जरांगे पाटील यांच्या नव्या अर्जावर मुंबई पोलीस काय निर्णय घेतात आणि परवानगी नाकारली गेल्यास ते हायकोर्टात कोणती भूमिका मांडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ