जरांगेंच्या मुंबई आंदोलनावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला, मंत्र्यांच्या मानवाकवण्यावर टीका
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय. गणेशोत्सवाच्या ऐन काळातच हे आंदोलन होणार असल्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीकेची झोड उठवली.
मंत्री जरांगेंकडे जाताना इतकी मान वाकवतात, की त्यांची मान कशी तुटत नाही असं म्हणायची वेळ आलीय, असं वडेट्टीवार म्हणाले. पाळीव प्राण्यालाही लाज वाटेल अशा पद्धतीनं मंत्री मान वाकवत जातात, त्यामुळेच जरांगे पाटलांना आपण बादशहा झाल्यासारखं वाटतं, अशी टीका त्यांनी केली. सरकार झुकतंय आणि झुकवणारा हवा असतो, हे जरांगेंना पक्कं ठाऊक आहे. सरकार झुकतंच आहे, त्यामुळे पुढे काय करायचं हा सरकार आणि जरांगे यांचा विषय आहे, ते बघून घेतील, असं वडेट्टीवार म्हणाले.
जरांगे मुंबईत आल्यावर मुंबईकरांना त्रास होईल का, या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, गणेशोत्सव असल्यामुळे गर्दी नक्कीच होईल, पण सरकारनं हे आंदोलन कसं हाताळायचं हे बघावं. ओबीसी विरुद्ध हिंदू असा वाद निर्माण करण्याचं काम सरकारनंच केलंय, हे ओबीसींवर आलेलं संकट आणि सरकारचं पाप आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
सरकार ओबीसींच्या प्रश्नात लक्षच घालत नाही, त्यांचे प्रश्न सोडवत नाही, असं सांगत वडेट्टीवार यांनी आकडेवारीही दिली. ओबीसींना नोकऱ्या देताना 80 टक्के लोकांच्या वाट्याला फक्त 15 टक्के जागा येतात, नोकरीतही तीच परिस्थिती आहे. आता जरांगे पुन्हा आंदोलन करतायत, ते कसं हाताळायचं हा सरकारचा प्रश्न आहे, आमच्या मागण्या आम्ही आधीच मांडल्या आहेत, सरकारनं याचं गांभीर्य ठेवावं, असं आवाहन त्यांनी केलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी काहीच शिल्लक राहिलेलं नाही, काही जिल्ह्यांत 90 टक्के जागा मायक्रो ओबीसींच्या हातून गेल्यात, असं वडेट्टीवार म्हणाले. पूर्वी जिल्हा परिषदेतही असंच घडलं, ओबीसींच्या नावावर प्रमाणपत्र घेऊन बोगस उमेदवार निवडून आले, प्रस्थापित आणि खोटे प्रमाणपत्रधारक लोक निवडून येतायत, मग ओबीसी नेमके सुरक्षित कुठे आहेत, हे सरकार खरंच ओबीसींचं हित बघतंय का, असा सवाल करत त्यांनी ही सगळी बनवाबनवी असल्याची टीका केली.
सरकारमध्ये खरंच दम असेल तर हे आंदोलन हाणून पाडायला हवं, असं म्हणत वडेट्टीवार यांनी आणखी एक आरोप केला. ओबीसी नेत्यांबद्दल खालच्या दर्जाची, घाणेरडी भाषा वापरली जाते, अशी भाषा ऐकून त्यांच्या बुद्धीची कीव यायला लागते, असं ते म्हणाले. आंदोलनाला विरोध नाही, पण सरकार शेपूट घालून बसलंय, कारवाई करायचा दम त्यांच्यात नाही, कमरेखालच्या शिव्या खाऊनही लाज वाटत नाही, हेच सरकारचं नाकर्तेपण असल्याची टीका त्यांनी केली.
मोठमोठ्या नेत्यांवर जरांगे बोलत असतील, तर सरकारनं भूमिका घेऊन कारवाई करावी, दम असेल तर करावी, नाहीतर पुन्हा मंत्री पाठवून आंदोलकांचे पाय चेपून द्यावेत, जरांगे पाटलांच्या पायाची मसाज करून द्यावी, म्हणजे ते ऐकतील, असा उपरोधिक टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. सध्या जे काही सुरू आहे, ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, असं ते म्हणाले.