जरांगे पाटील यांचा मुंबई मार्चचा दौरा प्रकृतीमुळे रद्द होण्याची शक्यता, पाटोद्यात रात्री दोन वाजता सभा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या या दौऱ्याचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा इथे पडला. 15 सप्टेंबरला जरांगे पाटील यांची पाटोद्यात सभा ठरली होती, मात्र नियोजित वेळेपेक्षा खूपच उशिरा, मध्यरात्री तब्बल दोन वाजता ही सभा पार पडली. एवढ्या उशिराच्या वेळेतही त्यांना ऐकण्यासाठी हजारो मराठा समाजबांधव आणि महिलांची मोठी गर्दी जमली होती.
या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी स्वतःच्या प्रकृतीचा उल्लेख करत पुढच्या दौऱ्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. उपोषण करत दौरा करणे सोपे नसल्याचे आणि शारीरिक त्रास प्रचंड वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. "त्यामुळे मी पुढचा दौरा रद्द करू शकतो. दौरा महत्त्वाचा नाही, आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून थेट मुंबईला जाईन," असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
प्रकृतीपेक्षा आरक्षण जास्त महत्त्वाचं असल्याचं आणि दौरा महत्त्वाचा नसल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. आपल्याकडून आता पुढचा दौरा शक्य होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रकृती सुधारली तर पुढच्या दौऱ्यात सहभागी होऊ, मात्र त्रास असाच राहिला तर प्रवास करणं शक्य होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सतत उपोषण आणि प्रवासामुळे येणारा शारीरिक थकवा पाहता दौरा थांबवून थेट मुंबईकडे जाण्याची शक्यता जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुढच्या दिवसांत ते दौरा सुरूच ठेवतात की तो रद्द करून थेट मुंबईकडे रवाना होतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, पाटोदा इथे जरांगे पाटील यांचा ताफा रात्री उशिरा पोहोचला. एवढी उशिराची वेळ असूनही हजारो मराठा समाजबांधव त्यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी हजर होते. यावेळी उपस्थित जमावाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी पुढच्या प्रवासाबाबत हे संकेत दिले.
पाटोद्यातील सभेत जरांगे पाटील यांनी असंही सांगितलं की, पुढच्या प्रवासात लोकांनी मोठ्या संख्येने वाहनं घेऊन येऊ नयेत. "उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे नको, माझ्या मागे आलात तर मी पुन्हा अंतरवाली सराटीत जाईन, नाहीतर पाटोद्यातच उपोषण सुरू करेन," असा इशारा त्यांनी दिला.
आपल्याला 58 लाख नोंदी मिळाल्या असून या नोंदींच्या आधारे मोठ्या संख्येने समाज आरक्षणाच्या प्रक्रियेत जाईल, असं जरांगे पाटील म्हणाले. आता गॅझेटसाठी प्रयत्न सुरू असल्याचं आणि सगळ्या नोंदी पेनड्राइव्हमध्ये घेतल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. "सरकारने काहीही म्हटलं तरी नोंदी आपल्या हातात आहेत. आता आपल्याकडे चेक आहे. आपण तो कधीही बँकेत टाकू शकतो. मराठे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत," असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.