मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी मोठी खलबतं, फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात बैठक, तोडगा निघणार?
आंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक सुरू असतानाच नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक पार पडत असतानाच नागपुरातही एक महत्त्वाची बैठक झाली. मनोज जरांगे पाटील यांनी आधीच मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर नागपुरात एक मोठी घडामोड घडली. जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष तसंच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरू झाली. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुद्दा मुख्य चर्चेचा विषय असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला रवाना होणार आहेत. त्याआधीच नागपुरातल्या रामगिरी बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळे यांची बैठक सुरू झाली. या बैठकीत जरांगे पाटील यांची मागणी आणि त्यांची भूमिका यावर चर्चा झाल्याचं समोर येतंय. त्याचवेळी आज दुपारी आंतरवाली सराटीत मराठा बांधवांसोबत जरांगे पाटील यांची राज्यव्यापी बैठक होत आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये नेमकं काय ठरतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री काल पासून नागपुरात मुक्कामी होते आणि थोड्याच वेळात ते दिल्लीकडे निघणार आहेत. दिल्ली दौऱ्याला निघण्यापूर्वी झालेली ही भेट आणि बैठक याच कारणामुळे महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या अर्धा तासापासून ही बैठक सुरू असल्याचं सांगितलं जातंय. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि जरांगे पाटील यांच्या मागणीवर काही तोडगा निघणार का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दुसरीकडे आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक पार पडत आहे. या बैठकीत मराठा समाज बांधवांशी चर्चा करून मुंबई आंदोलनाची दिशा ठरणार असल्यामुळे वेगवेगळ्या भागातून मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने येत आहेत. आजच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल, अशा प्रतिक्रिया अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा समाज बांधवांनी दिल्या. शिवाय यावेळी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा पक्का निर्धारही समाज बांधवांनी केल्याचं दिसून आलं. यासोबतच शासनाने फसवणूक केल्यामुळे तिसऱ्यांदा मुंबईला जाण्याची वेळ आल्याची खंतही समाज बांधवांनी व्यक्त केली. एकीकडे नागपुरात सरकारी पातळीवर खलबतं सुरू असताना दुसरीकडे आंतरवाली सराटीत मराठा समाज बांधव मुंबईतील आंदोलनाची तयारी आणि दिशा ठरवत होते, अशी परिस्थिती आज दिसून आली.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.