Devendra Fadnavis : 'अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती'; फडणवीसांचा विरोधकांना थेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेसंबंधीच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि मनसेने अमित शाह यांच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं. "अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर अशी टीका झालीच नसती. त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती," असा जोरदार टोला फडणवीसांनी लगावला.
अमित शाह यांचं हे वक्तव्य नवी मुंबईत झालेल्या राजभाषा संमेलनात आलं होतं. या संमेलनात बोलताना अमित शाह यांनी हिंदी भाषेबाबत आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र ही देशातील सगळ्यात मोठी बहुभाषिक भूमी असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं होतं. आपल्या मातृभाषेसोबतच दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्याला विरोध करणं योग्य नाही, असंही शाह म्हणाले होते. अमित शाह यांच्या याच वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि ठाकरे गट व मनसेने त्यांच्यावर टीका केली.
याच वादावर बोलताना फडणवीसांनी अमित शाहांचं संपूर्ण भाषण ऐकण्याचा सल्ला विरोधकांना दिला. महाराष्ट्रात मराठी भाषेचं महत्त्व काय आहे, मातृभाषेचं स्थान काय आहे, हे अमित शाहांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातले नागरिक बहुभाषिक आहेत याचा अर्थ त्यांची मातृभाषा बदलते असा होत नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं. संपूर्ण भाषण न ऐकता केवळ काही भाग ऐकून त्यावर टीका करणं चुकीचं असल्याचं सांगत, "सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि त्यावर टीका करायची, हे योग्य नाही," असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच..." अशी अगदी मोजक्या शब्दांत पोस्ट राज ठाकरेंनी केली. अमित शाह यांच्या राजभाषा संमेलनातील वक्तव्यानंतर लगेचच ही पोस्ट आल्याने तिचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना आणि चर्चांना उधाण आलं आहे.
या शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं. जरांगे यांनी पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज केला असून त्यावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यात मोठी गर्दी असते, त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.