बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी
नालासोपारा-विरार पट्ट्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसर पाण्याखाली, गणेशोत्सव मंडपांच्या तयारीलाही फटका
गणपती बाप्पाच्या स्वागताला अवघे काही तास बाकी असताना वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात रविवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला. पहाटे तीन वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने शहरातील मुख्य रस्ते, सखल भागातील वस्त्या आणि काही गणेशोत्सव मंडप पाण्याखाली गेले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे रोजचे जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून उत्सवाच्या तयारीतही अडथळे आले आहेत. उत्सवाच्या सुरुवातीलाच असा पाऊस पडल्याने पुढील काळात आणखी पाऊस येणार का, अशी चिंता नागरिकांना सतावते आहे.
शहरातील नाले आणि गटारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसाचा जोर काही काळ तसाच कायम राहिला, त्यामुळे शहरातील सखल भागांत आणि प्रमुख वस्त्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर, सेंट्रल पार्क, तुळींज रोड, गालानगर, विरार पश्चिमेकडील रस्ते तसेच नायगाव परिसरातील अनेक भागांत पाणी साचले. या सगळ्या भागांतील रहिवाशांना पावसाचा मोठा फटका बसला.
नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने लोकल पकडायला निघालेल्या प्रवाशांना पाण्यातून वाट काढतच स्थानक गाठावे लागले. रोजच्या रोज लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे मोठी अडचण झाली. विरारहून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला. यामुळे नोकरीसाठी बाहेर पडलेले चाकरमानी आणि कोकणात जाणारे भाविक वाहतूक कोंडीत अडकून पडले आणि त्यांची मोठी गैरसोय झाली.
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाणी साचलेल्या ठिकाणी सक्शन पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने हे पाणी उतरण्यास अडथळे येत आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी सातत्याने काम करावे लागत आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे सणाच्या तोंडावरच शहरात भीतीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांचीही या अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. शनिवारीच अनेक मंडळांनी वाजतगाजत बाप्पाच्या मूर्ती मंडपांमध्ये आणून ठेवल्या होत्या. पण रविवारी पहाटेपासून काही गणेश मंडपांमध्ये पाणी शिरल्याने सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई आणि देखावे सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. अनेक मंडपांमध्ये कार्यकर्ते पंपांच्या मदतीने आतले पाणी बाहेर काढताना दिसले, तर काहींनी सजावटीचे सामान उंचावर हलवून ते भिजण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला.