वरुड तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये सुविधांचा अभाव, निकृष्ट आहार व दूषित पाण्यावरून पालक संतप्त
वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये वीज, गॅस, शौचालय यांसारख्या मुलभूत सुविधांची वानवा असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्रामपंचायत आणि गटग्रामपंचायतींच्या अखत्यारीत चालणाऱ्या अनेक अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधांचीच वानवा असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी वीज कनेक्शन नाही, तर काही अंगणवाड्यांमध्ये गॅस जोडणीच उपलब्ध नाही. शौचालय आणि स्नानगृहासारख्या साध्या सुविधाही अनेक अंगणवाड्यांमध्ये नसल्याने तिथे येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने अंगणवाड्यांच्या कामकाजासाठी एक निश्चित वेळापत्रक आखून दिलेले असले तरी अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वेळेवर हजर राहत नसल्याने काही अंगणवाड्या उशिरा सुरू होतात, तर काही ठिकाणी अंगणवाड्या पूर्णपणे बंद असल्याचाही आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बालकांना पोषण आहारातून सकस अन्न मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या आहेत. यामुळे शासनाचा मूळ उद्देश आणि प्रत्यक्षात लाभार्थी बालकांना मिळणारा फायदा यांच्यात मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसते. काही अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची कोणतीही सोय नाही, तर काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाणी निर्जंतुक करण्यासाठी लागणाऱ्या ब्लिचिंग पावडरचाही पुरेसा वापर केला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीतील मुलांना पोषण, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यांतील बालके या मुलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचे चित्र कायम आहे.
अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तिथल्या सुविधांची कमतरता तातडीने दूर करावी, सेविका आणि मदतनीस यांच्या हजेरीचे नियमित निरीक्षण करावे, बालकांना दर्जेदार पोषण आहार द्यावा, तसेच स्वच्छ पाणी, शौचालय, स्नानगृह, वीज आणि गॅस या सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ग्रामीण भागातील नागरिकांनी निवेदन देऊन मागणी नोंदवली आहे.
बेनोडा (शहीद) अंगणवाडीच्या पर्यवेक्षक साधना पांडे यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकांनी अनेकदा ग्रामपंचायत आणि गटग्रामपंचायतीकडे समस्यांबाबत तक्रार केली आहे, परंतु सरपंच आणि सचिवांकडून सहकार्य मिळत नाही. यावर महिला बालकल्याण प्रकल्प विभागाच्या नयना इंगोले यांनी सांगितले की, या समस्या पंचायत समितीच्या सभेत कृती आराखडा आणि बजेटमध्ये मांडण्यात येणार आहेत.