अमली पदार्थमुक्त समाजासाठी पोलिसांची जनजागृती मोहीम, कडक कायद्यांखाली कारवाईचे आदेश
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्धा जिल्ह्यात अमली पदार्थमुक्त समाज घडवण्यासाठी पोलीस दलाने जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्यांना यापासून परावृत्त करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेमागे आहे. याच वेळी जे कोणी अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सापडतील त्यांच्यावर मकोका, एमपीडीए आणि पिट एनडीपीएस यांसारख्या कडक कायद्यांखाली कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस दलाला देण्यात आले आहेत. या तिन्ही कायद्यांचा वापर करून अमली पदार्थांच्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे नियोजन आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीही स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी वाहतूक शाखेच्या अंमलदारांची नेमणूक करून शहरात नियमित गस्त घातली जाणार आहे. मात्र ही कारवाई करताना सर्वसामान्य नागरिकांना किंवा रस्त्यावरील वाहतुकीला कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करून सर्व नियमांचे पालन होईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.
सोशल मीडियावरही बारकाईने नजर ठेवली जाणार असून कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा प्रकार घडू नये यासाठी कटाक्षाने लक्ष देण्यात येणार आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांचा जलद गतीने शोध घेऊन ते लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहेत. अवैध दारू विक्री आणि तस्करीवरही कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्ह्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करत आरोपींच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे, असे या सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपी तसेच मुद्देमाल कसोशीने शोधून अशा दाखल गुन्ह्यांचा जलद निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हरवलेल्या व्यक्ती आणि लहान मुलांचा शोध एसओपीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार जलद गतीने घेण्यात यावा असेही सांगण्यात आले आहे. अवैध जुगाराच्या ठिकाणांवरही शोध मोहीम राबवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व पोलीस ठाणेदारांनी आपापल्या हद्दीत नियमित 'संवाद' बैठका घ्याव्यात आणि पोलीस स्टेशन स्तरावर सर्व अधिकारी व अंमलदारांची नियमित बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घ्यावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
या आढावा बैठकीला वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस स्टेशन, विशेष शाखा आणि इतर संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदारांसोबत स्नेहभोजन घेतले.