नाशिकमध्ये खड्डे आणि पावसाचा फटका; काही मिनिटे उशीर झाल्याने UPSC विद्यार्थ्यांना परीक्षेस मज्जाव
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे, पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे काही विद्यार्थी NDA-NA II परीक्षेसाठी वेळेत पोहोचू शकले नाहीत. के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या केंद्रावर प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा आणि रविवारच्या पावसाचा फटका थेट UPSC परीक्षार्थींना बसला. रविवारी, म्हणजेच १३ तारखेला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल प्रबोधिनी द्वितीय म्हणजे NDA-NA II ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी शहरातील १३ उपकेंद्रांवर विद्यार्थी दाखल झाले होते, मात्र काही विद्यार्थी निर्धारित वेळेनंतर अवघी दोन ते तीन मिनिटे उशिरा पोहोचले आणि त्यांना केंद्रात प्रवेशच नाकारण्यात आला.
के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील केंद्रावर हा गोंधळ सर्वाधिक जाणवला. सकाळी साडेनऊ वाजता रिपोर्टिंगची वेळ निश्चित करण्यात आली होती. शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यात रस्त्यांवरचे खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे वाहनांचा वेग मंदावला. अनेक विद्यार्थी वेळेच्या कितीतरी आधी घरातून निघाले होते, पण याच अडथळ्यांमुळे त्यांना केंद्रावर पोहोचायला काही मिनिटांचा उशीर झाला.
बंद झालेल्या दरवाजासमोर उभे राहून विद्यार्थी आत सोडण्याची विनवणी करत होते. 'फक्त दोन मिनिटे झाली आहेत, आत जाऊ द्या', असे म्हणत विद्यार्थी गयावया करत होते. पण नियमांचे कारण देत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा केंद्राच्या दारापर्यंत पोहोचूनही आत जाता न आल्याने काही विद्यार्थ्यांना रडू आवरता आले नाही.
या प्रकरणावर निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी खुलासा केला. UPSCच्या नियमानुसार परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधीच प्रवेशद्वार बंद केले जाते, असे त्यांनी सांगितले. प्रवेशाची वेळ संपल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला त्यात सूट देण्याचा अधिकार नसतो, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
आपल्या मुलांना परीक्षा देता आली नाही म्हणून संतप्त झालेल्या पालकांनी केंद्राबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे मुलांना उशीर झाला असेल, तर त्याची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. काही वेळ केंद्राबाहेर तणावाचे वातावरण तयार झाले होते. संतप्त पालकांनी UPSCच्या परीक्षा निरीक्षकांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला, त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली.
UPSC परीक्षेसाठी वेळेचे आणि नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असले, तरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसाचे साचलेले पाणी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनाने परीक्षा केंद्रांभोवती आधीच वाहतूक नियोजन केले होते का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अवघ्या काही मिनिटांच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा हुकल्याने नाशिकमधील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.