जळगावात गणेश विसर्जन मार्ग सज्ज: ९० टक्के खड्डे बुजवले, धोकादायक फांद्यांचीही छाटणी
जळगाव महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी मार्गाच्या डागडुजीचे काम वेगाने हाती घेतले आहे.
जळगाव शहरात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुका सुरक्षित तसेच विनाअडथळा पार पडाव्यात, यासाठी जळगाव महानगरपालिकेने विसर्जन मार्गाच्या डागडुजीचे काम वेगाने हाती घेतले आहे. शहरातून जाणाऱ्या मिरवणूक मार्गावरील जवळपास ९० टक्के खड्डे बुजवण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी सांगितले आहे. उर्वरित काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
खड्डे बुजवण्याच्या कामासोबतच मार्गावर असलेल्या झाडांच्या धोकादायक आणि लोंबकळणाऱ्या फांद्यांचीही पाहणी करण्यात आली असून जिथे गरज आहे तिथे त्यांची छाटणी सुरू करण्यात आली आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात आणि त्यामध्ये उंच गणेशमूर्ती, सजावटीचे रथ आणि मोठी वाहने नेली जातात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांचा अडथळा मिरवणुकीला नेहमीच जाणवतो. काही ठिकाणी अशा कमकुवत आणि लोंबकळणाऱ्या फांद्यांमुळे नागरिकांच्या तसेच मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने आधीच अशा धोकादायक ठिकाणांचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली आहे. महापालिकेच्या विद्युत, अग्निशमन, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम या चार विभागांनी एकत्र येऊन ही मोहीम राबवली असून संबंधित पथकांनी मार्गाची पाहणी करून जिथे आवश्यकता होती तिथे कार्यवाही केली. यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. आता गणेशोत्सव जवळ आल्यामुळे प्रशासनाने विसर्जन मार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरून जाणाऱ्या गणपती मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला विशेष गती दिली आहे. मात्र शहरातील तीन ते चार प्रभागांमध्ये खड्डे बुजवण्याचे काम अद्याप सुरू झाले नव्हते, त्यामुळे संबंधित मक्तेदारांना आयुक्त आदित्य जिवने यांनी नोटीस बजावून काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिकेने शहरातील गणेश मंडळांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. मंडळांनी उत्सवाच्या निमित्ताने केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या झाडांचे संगोपनही करावे, असा संकल्प करावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सुरक्षित विसर्जनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव व्हावा, यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.
आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या फांदी छाटणी मोहिमेत अनावश्यक वृक्षतोड टाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरणाऱ्या, धोकादायक किंवा खाली लोंबकळणाऱ्या फांद्यांचीच गरजेनुसार छाटणी करण्यात आली. यामुळे एकीकडे विसर्जन मार्ग मोकळा झाला असून दुसरीकडे शहरातील वृक्षसंपदेचेही संरक्षण करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला आहे.