जलसंपदा खात्यातील निवृत्त अभियंत्यांच्या अनुभवाचा वापर करा- राधाकृष्ण विखे पाटील
यशदा येथे अभियंता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात जलसंपदा मंत्र्यांनी सल्लागार मंडळ स्थापनेची सूचना केली.
राज्याच्या जलसंपदा खात्यातून निवृत्त झालेल्या अनुभवी अभियंते आणि अधिकाऱ्यांचा प्रदीर्घ अनुभव पुढील काळातील पाणी व्यवस्थापनासाठी वापरून घेतला पाहिजे, असं जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. यासाठी जलसंपदा खात्यासोबतच प्रत्येक महामंडळाच्या पातळीवर सल्लागार मंडळ स्थापन करण्याचा विचार व्हावा, असं त्यांनी सुचवलं.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा इथं जलसंपदा खात्याकडून आयोजित अभियंता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रकल्प समन्वय सचिव जयंत बोरकर, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुदर्शन पगार आणि तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे उपस्थित होते.
राज्यातील शेती आणि पाणी व्यवस्थेसाठी अभियंत्यांनी दिलेलं योगदान मोठं आहे, असं विखे पाटील यांनी सांगितलं. या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांच्या कामाचा गौरव होतो आहे. जलसंपदा खात्यातील अनुभवी अधिकारी आणि अभियंत्यांनी वर्षानुवर्षे मोठं काम केलं असून त्यांचा अनुभव खात्याला सतत मिळत राहणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर कसा करता येईल, याचा सगळ्यांनी विचार करावा, असंही त्यांनी नमूद केलं.
जलसंपदा खात्यातील पुरस्कारांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात आली, आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत विखे पाटील यांनी प्रत्येक महामंडळासाठी किमान तीन पुरस्कार द्यावेत अशी सूचना केली. पुढच्या वर्षापासून प्रत्येक महामंडळासाठी तीन ते पाच पुरस्कार ठेवण्यास आपली मान्यता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेसाठी जलसंपदा खात्यातील सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असं आवाहनही विखे पाटील यांनी केलं.
धरणं बांधण्याबरोबरच त्यातलं पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवणं आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणं हे खात्याचं मुख्य उद्दिष्ट असायला हवं, असं जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन यांनी सांगितलं. जलसंपदा खात्यातील अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे राज्याच्या जलविकासाला मोठी चालना मिळाली आहे, असं ते म्हणाले. जलसंपदा खातं हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. पाइपद्वारे पाणी वितरण, ठिबक आणि तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची गळती आणि बाष्पीभवन कमी करण्यावर भर द्यायला हवा, असं महाजन यांनी सांगितलं. धरणांतील गाळ काढणं, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही येणाऱ्या काळातली महत्त्वाची आव्हानं आहेत. अभियंता गौरव पुरस्कार हा संपूर्ण जलसंपदा खात्याच्या टीमवर्कचा गौरव असून पुरस्कारानंतर जबाबदारी आणखी वाढते, असंही महाजन यांनी नमूद केलं.
जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, वन व पर्यावरण मंजुरी तसेच पुनर्वसनाच्या बाबींचं नीट नियोजन करून त्या बांधकामाच्या कामासोबत समन्वयानं पूर्ण कराव्यात, असं जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितलं. खात्यातील साधारण सहा हजार तांत्रिक मनुष्यबळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी अभियंता पुरस्कारांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. सेवा संकल्प अभियानअंतर्गत जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, जलवापर संस्थांचं प्रशिक्षण, सिंचन वाढ आणि लोकसहभाग यासाठी नियोजन करण्याचं आवाहनही डवले यांनी केलं.
या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या अभियंता दिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफित दाखवण्यात आली. तसेच राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ मध्ये महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं.
या वेळी २०१९ ते २०२४ या काळातील वैयक्तिक आणि सांघिक पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. २०१९ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी प्रकाश बाबूराव भोसले, प्रवीण पांडुरंग पारस्कर तसेच सांघिक पुरस्कार सांगली पाटबंधारे मंडळाला; २०२० चे वैयक्तिक पुरस्कारार्थी निलेश गुरुनाथ भोईर, सचिन पुंडलिक पवार, मंगेश त्र्यंबकराव त्रिपिटे तसेच सांघिक पुरस्कार जिगाव प्रकल्प आणि बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाला; २०२१ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी समाधान धोंडीबा सर्पेलवार, अरुण रामचंद्र नाईक, सायली राजेंद्र पाटील, प्रमोद पुंजाजी महाले, विजय हरी पाटील तसेच सांघिक पुरस्कार मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिकला; २०२२ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी संजीव दगडू चोपडे, गोकुळ श्रावण महाजन, प्रवीण वसंतराव देशमुख, धनंजय महादेव कोकरे, जयपाल संजय चौरासिया तसेच सांघिक पुरस्कार रत्नागिरी पाटबंधारे मंडळ आणि नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाला; २०२३ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी अजित भारत गौड तसेच सांघिक पुरस्कार जल हवामान आधार सामग्री प्रक्रिया विभाग, नाशिकला आणि २०२४ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी अनिता उदय पराते व राजरत्न महादेवराव रणदिवे यांचा गौरव करण्यात आला. या वेळी जलसंपदा खात्यातील अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.