गणेशोत्सवासाठी मुंबईत लालबाग-परळ भागातील 7 रस्ते बंद, वाहतुकीत मोठे बदल
गणेशोत्सवात लालबाग, परळ आणि काळाचौकी भागात होणारी गर्दी लक्षात घेता 14 ते 25 सप्टेंबर या काळात 7 मार्ग 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच अनेक रस्त्यांवर नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात लालबाग, परळ आणि काळाचौकी या भागात गणेशभक्तांची प्रचंड गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टळावी आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत या परिसरातील काही रस्त्यांवर वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले असून, तब्बल 7 प्रमुख मार्ग 24 तासांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवात मुंबईतील विविध गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या भागात येतात. लालबाग, परळ आणि काळाचौकी हा पट्टा त्यातील मुख्य केंद्र असल्याने इथे वाहतूक प्रचंड वाढते. या गर्दीमुळे वाहतूक कोंडीबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून प्रशासनाने खबरदारी म्हणून हे बदल जाहीर केले आहेत.
वाहतूक बंद असलेल्या 7 मार्गांमध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे. डॉ. बी. ए. रोडवरील कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) ते हंसराज राठोड चौक (बावला कंपाउंड जंक्शन) हा मार्ग बंद राहील. महादेव पालव मार्गावरील (करी रोड) शिंगटे मास्तर चौक ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) हा टप्पादेखील बंद ठेवण्यात येणार आहे. संत जगनाडे महाराज चौक (गॅस कंपनी) इथे साने गुरुजी मार्गावरून डॉ. बी. ए. रोडच्या दिशेने जाणारे उजवे वळण बंद करण्यात आले आहे. दत्ताराम लाड मार्गावर उडपी हॉटेल ते शांताराम पुजारी चौकदरम्यान वाहतूक बंद राहील. गणेशनगर लेन (चिवडा गल्ली) डॉ. बी. ए. रोड जंक्शनपासून माधव प्रभू चौकातील पूजा हॉटेल जंक्शनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दिनशॉ पेटीट लेन डॉ. बी. ए. रोड जंक्शनपासून गणेशनगर लेन जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. डॉ. एस. एस. राव रोडवर सदाशिव गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यंतचा भाग बंद ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होते. त्यामुळे असुरक्षित पुलांवर पादचाऱ्यांची गर्दी वाढल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो, म्हणून काही पूल वापरण्यास बंदी घालणे गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परिसरातील अनेक रस्त्यांवर नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. बी. ए. रोड, साने गुरुजी मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, गणेशनगर लेन, दिनशॉ पेटीट लेन, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, जी. डी. आंबेकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, अनंत मालवणकर मार्ग, श्री साईबाबा मार्ग, टी. बी. कदम मार्ग, दत्ताराम खामकर मार्ग, तानाजी मालुसरे मार्ग, जीजीभाई मार्ग आणि महादेव पालव मार्ग यांचा समावेश आहे.
त्यामुळे 14 ते 25 सप्टेंबर या काळात लालबाग, परळ आणि काळाचौकी भागातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी घराबाहेर पडण्याआधी या वाहतूक बदलांची माहिती घ्यावी आणि शक्य असेल तिथे पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.