बीड-पुणे रेल्वेगाडीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची हिरवी झेंडी, नाट्यगृह व तारांगणाचेही भूमिपूजन
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीडकरांसाठी थेट पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण आणि तारांगण प्रकल्पाचेही भूमिपूजन
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी १७ सप्टेंबर हा दिवस मोठा ऐतिहासिक ठरला. अनेक दशके प्रतीक्षेत असलेल्या बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. याच कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील पंढरी येथे उभारल्या जाणाऱ्या विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले.
या सोहळ्याला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार विजयसिंह पंडित हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासकीय बाजूने उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हजर होते. बीड जिल्हा कित्येक दशके रेल्वे नकाशापासून दूर राहिल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला त्रास सहन करावा लागत होता. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून सुरू झालेल्या या थेट सेवेमुळे बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्वप्नांची आठवण करून दिली. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी रेल्वे जोडणीला नेहमी प्राधान्य दिले होते. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवास करता येईल, असे वचन दिले होते. ते वचन आज पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुढील काही महिन्यांत बीड ते पनवेल थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. बीड-परळी मार्ग पूर्ण झाल्यावर हा मार्ग थेट दक्षिण भारताशी जोडला जाईल आणि त्यातून मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेल्वेच्या शुभारंभासोबत बीड शहरातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचीही मुहूर्तमेढ रोवली गेली. स्थानिक कलाकारांचे अनेक दशकांपासूनचे व्यासपीठ असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी प्रशासकीय पातळीवर मंजूर झाला आहे. जुन्या भिंती कायम ठेवत तिथे अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड इकोस्टिक, सेंट्रल एसी, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय धानोरा रस्त्यावरील पंढरी येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचे तारांगण व विज्ञान उद्यान उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा नियोजन समितीने १४ कोटी रुपयांना मंजुरी दिली असून, विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची माहिती इथे मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या आणि तुरुंगवास भोगलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने मंचावरून त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी रेल्वेगाडी सुटण्याची घोषणा परिसरात घुमली, शिट्टी वाजली आणि इंजिनाने जोरदार आवाज करत गाडीने पुढच्या प्रवासासाठी वेग घेतला. भारतीय रेल्वेचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान या विषयावरील निबंध आणि चित्रकला स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले, तर विभागीय रेल्वे प्रबंधक राजेशकुमार वर्मा आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.