भारत-पाकिस्तान १९९१ कराराचा भंग; अरबी समुद्रात पाकिस्तानी जहाजाची भारतीय युद्धनौकेला धडक
अरबी समुद्रात पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाने भारतीय युद्धनौकेला धडक दिल्याने १९९१ च्या भारत-पाकिस्तान लष्करी कराराचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून सातत्याने वादग्रस्त कारवाया होत असल्याचे दिसत आहे. जमीन आणि आकाशापाठोपाठ आता समुद्रातही पाकिस्तानच्या हालचालींमुळे भारताच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे. मंगळवारी संध्याकाळी अरबी समुद्रात एका भारतीय युद्धनौकेची अचानक पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजाशी गाठ पडली. यावेळी पाकिस्तानने जाणीवपूर्वक धोकादायक आणि अतिवेगाने जहाज वळवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे दोन्ही जहाजांमध्ये किरकोळ धडक झाली. ही घटना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घडली असून यात कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
या प्रकारामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. मात्र यातून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे बोलले जात आहे, कारण या धडकेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील ३५ वर्षे जुन्या लष्करी कराराचे थेट उल्लंघन झाले आहे. भारताचे या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसले, तरी पाकिस्तानने केलेल्या या कृतीचे गांभीर्य कमी होत नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एप्रिल १९९१ मध्ये एक महत्त्वाचा लष्करी करार झाला होता. लष्करी कवायती, युद्धाभ्यास आणि सैन्याच्या हालचालींबाबत एकमेकांना आगाऊ माहिती देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला होता. यापूर्वीही दोन्ही देशांनी सागरी घटनांच्या वेळी या कराराच्या कलम १० चा संदर्भ दिला आहे. ताज्या घटनेमुळे याच कलम १० चा थेट भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कराराच्या कलम १० नुसार, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात कार्यरत असताना कोणताही अपघात टाळण्यासाठी दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांनी आणि पाणबुड्यांनी एकमेकांपासून ३ सागरी मैलांपेक्षा अधिक जवळ येऊ नये, असे बंधन घालण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव कमी करण्यासाठी, गैरसमज दूर करण्यासाठी आणि सीमेवर होणारे अपघाती संघर्ष टाळण्यासाठी विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांअंतर्गत (CBMs) हा करार करण्यात आला होता. यानुसार दोन्ही देशांनी सीमेजवळ कोणतीही मोठी लष्करी कवायत, सैन्याची हालचाल किंवा युद्धाभ्यास करण्यापूर्वी एकमेकांना आगाऊ सूचना देणे बंधनकारक आहे, जेणेकरून सीमेवरील दल सतर्क राहतील आणि अशा हालचालींना धोका समजणार नाहीत. या करारावर ६ एप्रिल १९९१ रोजी नवी दिल्लीत स्वाक्षरी करण्यात आली होती.
घटनेनंतर भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान नौदलाच्या या अविवेकी आणि अव्यावसायिक वर्तनाबाबत तीव्र आक्षेप नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी दूतांना बोलावण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला यासंदर्भात माहिती दिली. भारताने पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांची लष्करी जहाजे समुद्रात असताना त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोन्ही देशांनी संबंधित करारांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचेही भारताने नमूद केले आहे.