भंडारा जिल्ह्यात ट्रक-पिकअप अपघातात 9 मजुरांचा मृत्यू, पोळ्याच्या दिवशी शोककळा
नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर लाखनी तालुक्यात भरधाव पिकअप ट्रकवर आदळल्याने 9 मजुरांचा जागीच मृत्यू, 5 गंभीर जखमी.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोळा सणाच्या दिवशी झालेल्या या घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर (NH-53) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव-सडक येथील भाऊ ढाबा जवळ मजुरांनी भरलेली पिकअप गाडी अनियंत्रित होऊन थेट ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे रहिवासी घाबरून जागे झाले. पिकअप गाडीच्या चिंधड्या उडाल्या आणि त्यात बसलेले मजूर लोखंडी सांगाड्यात अडकून गंभीर जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हाईवेलगतच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरून एक ट्रक नागपूरच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणारी मजुरांची पिकअप गाडी ट्रकवर जाऊन आदळली. पिकअप गाडीत एकूण 14 मजूर होते, त्यापैकी काहींचा जागीच मृत्यू झाला तर एकाने उपचारादरम्यान प्राण सोडला. मृतांमध्ये महिला मजूर, लहान मुले आणि पुरुष मजुरांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस आणि परिसरातील गावकरी घटनास्थळी दाखल झाले. वाहनाच्या ढिगाऱ्यातून जखमींना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. गंभीर जखमी मजुरांना तातडीने भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृत आणि जखमी सर्व मजूर छत्तीसगडचे रहिवासी असून ते रोजगारासाठी नागपूरकडे निघाले होते.
पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी, पहाटेच्या वेळी पिंपळगाव येथील भाऊ ढाबा परिसरात झालेल्या या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोटापाण्यासाठी घर सोडून निघालेल्या मजुरांच्या घरी अपघाताची बातमी पोहोचताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेनंतर महामार्गावर स्पीड रडार यंत्रणा नसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहाटेच्या वेळी हाईवेवर बेलगाम वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा का सुस्त होती, तसेच पेट्रोल पंप आणि ढाब्यांच्या मुख्य लेनमध्ये येणाऱ्या जड वाहनांसाठी निश्चित केलेल्या सुरक्षा नियमांचे आणि इशारा फलकांचे पालन का केले जात नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन प्राथमिक तपास सुरू केला आहे. सणाच्या दिवशी रोजीरोटीसाठी निघालेल्या परप्रांतीय मजुरांच्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे.