नागपुरात फ्लॅटच्या नावाखाली 69 लाखांची फसवणूक, नंदनवन पोलिसांकडून चौघांवर गुन्हा
वाठोडा येथील जमिनीवर फ्लॅट बांधून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीकडून 69 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला असून नंदनवन पोलिसांनी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपूरच्या वाठोडा भागातील एका जमिनीवर फ्लॅट बांधून देण्याचे आश्वासन देत एका व्यक्तीकडून 69 लाख रुपये घेतल्याचा आणि नंतर फ्लॅटचा ताबा व रजिस्ट्री देण्यास नकार दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये श्रावण अपार्टमेंट, वाठोडा येथील रहिवासी दूतावास श्रावण वैद्य, अमितकुमार भैसारे, नागभूमी लेआउट छत्रपतीनगर येथील राजीव चुन्नीलाल अग्रवाल आणि नरहरी श्यामराव सुपारे यांचा समावेश आहे. यादवनगर येथील रहिवासी सद्दाम अली अकबर अली यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा येथील सद्दाम अली यांचा रानी दुर्गावती चौकात मटण विक्रीचा व्यवसाय आहे. राहुल चोले हा त्यांचा नियमित गिऱ्हाईक होता. दूतावास वैद्य हा राहुलचा सासरा. वैद्य यांनी सद्दाम यांना वाठोडा येथील कैलाश सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर स्वतःच्या जमिनीवर 'श्रावण अपार्टमेंट' उभारत असल्याची माहिती दिली होती.
जानेवारी 2020 मध्ये राजीव अग्रवाल, वैद्य आणि राहुल चोले यांनी सद्दाम अली यांना त्याच जमिनीवर बोलावून अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. सद्दाम यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि बँकेकडून कर्ज घेत राहुलमार्फत वैद्य यांना 69 लाख रुपये दिले.
अपार्टमेंटचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सद्दाम अली यांनी फ्लॅटचा ताबा आणि रजिस्ट्री करून देण्याची मागणी केली, मात्र आरोपींनी त्यास नकार दिला. याच काळात राजीव अग्रवाल यांनी एका फ्लॅटची रजिस्ट्री नरहरी सुपारे यांच्या नावे करून टाकली. पुढे नरहरी यांनी तोच फ्लॅट अमित भैसारे यांच्या नावे केला.
सद्दाम यांनी याबाबत राहुल आणि वैद्य यांना जाब विचारला असता राहुलने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. 2024 मध्ये राहुलचे निधन झाले. त्यानंतर सद्दाम यांनी नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याच दरम्यान नागपूरच्या वाठोडा भागात एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली सायबर भामट्यांनी 60.60 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. भामट्यांनी स्वतःला नागपूर पोलीस मुख्यालय आणि लखनऊ एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवत पीडितांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती. 65 वर्षीय पीडितांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबरला पीडित वृद्ध घरी असताना त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सऐप कॉल आला. 'चिराग' नावाच्या व्यक्तीने स्वतःला नागपूर पोलीस मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या आधार कार्डचा वापर करून आयसीआयसीआय बँकेत खाते उघडल्याचे आणि त्या खात्याचा वापर दहशतवाद्यांनी मनी लॉण्ड्रिंगसाठी केल्याचे सांगितले. आरोपीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवली.
त्यानंतर व्हाट्सऐप व्हिडिओ कॉलवर भूपेशकुमार नावाच्या व्यक्तीने स्वतःला लखनऊ एटीएसचा अधिकारी असल्याचे सांगत दोन तासांत चौकशीसाठी तिथे पोहोचण्यास सांगितले. पीडितांनी लखनऊला जाण्यास असमर्थता दर्शवली असता आरोपींनी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना 'डिजिटल अरेस्ट' ठेवण्याचे सांगितले. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडील संपूर्ण रक्कम 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या खात्यात जमा करावी लागेल, असे भामट्यांनी सांगितले. विश्वास बसावा यासाठी आरोपींनी त्यांना बनावट बँक स्टेटमेंट, डेबिट कार्ड आणि एनआयए व आरबीआयच्या नावाने तयार केलेली बनावट कागदपत्रे पाठवली.
वाठोडा भागातील आरोपींनी सुमारे दोन दिवस पीडितांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली देखरेखीखाली ठेवले आणि 7 सप्टेंबरला त्यांच्या खात्यातून 60.60 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून घेतले. रक्कम गमावल्यानंतर पीडितांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता ही सायबर फसवणूक असल्याचे उघड झाले.