परदेशस्थ भारतीयांना UPSC देऊन IAS-IPS होता येतं का? जाणून घ्या NRI आणि OCI साठीचे नियम
परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तरुणांमध्ये UPSC परीक्षेबाबत अनेकदा गोंधळ असतो. NRI आणि OCI कार्डधारकांसाठीचे नियम वेगळे आहेत, ते नेमके काय सांगतात हे जाणून घेऊया.
परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या अनेक तरुणांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो, तो म्हणजे यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा देऊन आपण आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनू शकतो का. या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेकजण एनआरआय आणि ओसीआय कार्डधारक यांना एकाच श्रेणीत समजून घेतात, आणि इथूनच खरा गोंधळ सुरू होतो. प्रत्यक्षात मात्र NRI आणि OCI कार्डधारकांसाठी UPSC परीक्षेचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत.
सगळ्यात आधी NRI बद्दल बोलायचं झालं तर, NRI म्हणजे मूळचा भारताचा नागरिक असलेली पण सध्या शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात राहणारी व्यक्ती. अशा व्यक्तीकडे भारताचं नागरिकत्व असल्यामुळे ती UPSC परीक्षा देण्यास पूर्णपणे पात्र ठरते. NRI उमेदवार IAS, IPS, IFS यांसह UPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या सर्वच पदांसाठी अर्ज करू शकतात.
दुसरीकडे OCI म्हणजे Overseas Citizen of India कार्डधारकांसाठीचे नियम मात्र खूपच कडक आहेत. UPSC च्या नियमांनुसार IAS, IPS आणि IFS या सेवांसाठी उमेदवार भारताचा नागरिक असणं बंधनकारक आहे. OCI कार्डधारक हे कायद्याने परदेशी नागरिक मानले जातात, त्यामुळे त्यांना या सेवांसाठी अर्ज करता येत नाही. काही केंद्र सरकारच्या इतर सेवांसाठी नेपाळ किंवा भूतानचे नागरिक पात्र ठरत असले, तरी IAS आणि IPS ही पदं मात्र फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहेत.
NRI उमेदवारांना परीक्षा देण्याची मुभा असली, तरी त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NEET सारख्या इतर परीक्षांमध्ये जसा NRI साठी वेगळा कोटा किंवा सवलत असते, तसं UPSC मध्ये मात्र काहीही नाही. NRI उमेदवारांना सामान्य प्रवर्गातून किंवा त्यांच्या मूळ प्रवर्गातूनच इतर उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते. शिवाय UPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंवा मुलाखत यापैकी कोणत्याही टप्प्यासाठी परदेशात कुठलंही केंद्र दिलं जात नाही. त्यामुळे परीक्षा द्यायची असेल तर उमेदवाराला भारतातच यावं लागतं.
याशिवाय ज्या NRI उमेदवारांनी पदवीचं शिक्षण परदेशातील एखाद्या विद्यापीठातून पूर्ण केलं असेल, त्यांच्यासाठी आणखी एक अट आहे. अशा उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज म्हणजेच AIU कडून समकक्षता प्रमाणपत्र म्हणजेच Equivalence Certificate घेणं बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर परदेशातील पदवीच्या आधारे UPSC साठी अर्ज करता येत नाही.