पितृपक्ष 2026: श्राद्ध, तर्पणाच्या तारखा जाहीर, सर्वपित्री अमावस्या 10 ऑक्टोबरला
यंदा पितृपक्ष 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात असणार असून, कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध करायचे याचे संपूर्ण वेळापत्रक आले आहे.
हिंदू धर्मशास्त्रात पितृपक्षाला खूप पवित्र मानले जाते. या दिवसांत पूर्वजांचे म्हणजे पितरांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. यंदा म्हणजे 2026 मध्ये पितृपक्ष 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात असणार आहे.
पितृपक्षातल्या प्रत्येक तिथीला वेगळे धार्मिक महत्त्व असते. वेदसेवक भिकेश प्रकाश जोशी गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या तिथी आणि तारखांची यादी पुढीलप्रमाणे आहे. 27 सप्टेंबर 2026 रोजी महालय आरंभ आणि प्रतिपदा श्राद्ध आहे. 28 सप्टेंबरला द्वितीया श्राद्ध, तर 29 सप्टेंबरला भरणी श्राद्ध आणि तृतीया श्राद्ध एकत्र येत आहेत. 30 सप्टेंबरला चतुर्थी आणि पंचमी श्राद्ध एकत्र आहेत. 1 ऑक्टोबरला षष्ठी श्राद्ध, 2 ऑक्टोबरला सप्तमी श्राद्ध आणि 3 ऑक्टोबरला अष्टमी श्राद्ध आहे.
4 ऑक्टोबर रोजी अविधवा नवमी म्हणजेच नवमी श्राद्ध आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबरला दशमी श्राद्ध, 6 ऑक्टोबरला एकादशी श्राद्ध, 7 ऑक्टोबरला द्वादशी श्राद्ध, 8 ऑक्टोबरला त्रयोदशी श्राद्ध आणि 9 ऑक्टोबरला चतुर्दशी श्राद्ध असे वेळापत्रक आहे. पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वपित्री अमावस्या असणार आहे.
शास्त्रानुसार ज्या तिथीला पूर्वजांचे निधन झाले असेल, त्याच तिथीला महालय श्राद्ध केले जाते. यातले काही दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात. 29 सप्टेंबरला येणारे भरणी श्राद्ध हे भरणी नक्षत्रावर किंवा याच वर्षात मृत पावलेल्या व्यक्तींसाठी खास मानले जाते. 4 ऑक्टोबरची अविधवा नवमी ही सौभाग्यवती म्हणजे पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांच्या स्मरणासाठी राखीव असते. तर 10 ऑक्टोबरची सर्वपित्री अमावस्या ही ज्या पूर्वजांच्या निधनाची तिथी माहीत नसते त्यांचे श्राद्ध करण्याचा दिवस असून, पितृपक्षातला हा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो.
पितृपक्षात रोज किंवा स्वतःच्या तिथीला पितरांना जलतर्पण करणे गरजेचे मानले जाते. या काळात कुतूप आणि रोहिण मुहूर्तावर श्राद्धविधी करणे, ब्राह्मणांना जेवण देणे आणि गोग्रास म्हणजे गाईला घास काढणे खूप फलदायी मानले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी राहते आणि पितृदोष शांत होतो असे मानले जाते.
पितृदोष नेमका का होतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. शास्त्रानुसार स्वतःकडून नकळत किंवा जाणूनबुजून झालेल्या काही चुकांमुळे हा दोष तयार होतो. यावर उपाय म्हणून शास्त्रांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यात श्राद्ध कर्माला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. जो माणूस श्रद्धेने श्राद्धविधी करतो, त्याच्या सौभाग्यात दिवसेंदिवस वाढ होते असे मानले जाते.
पितृदोष कोणत्या कारणांमुळे होतो, याबद्दलही शास्त्रात सांगितले आहे. पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण न करणे किंवा त्यांचा अपमान करणे यामुळे पितृदोष लागतो. नाग किंवा गाईची हत्या करणे अथवा करवून घेणे हे या दोषाचे मुख्य कारण मानले जाते. पवित्र नदी किंवा विहिरीच्या पाण्यात मल-मूत्र विसर्जन करणे किंवा ते पाणी अशुद्ध करणे यानेही हा दोष लागतो. कोणत्याही देवस्थानी किंवा तीर्थक्षेत्री गैरकृत्य अथवा पाप केल्यासही या दोषाचे भागीदार व्हावे लागते. अमावस्येच्या तिथीला शारीरिक संबंध ठेवणे किंवा गुरूची पत्नी अथवा गुरूच्या मुलीशी गैरसंबंध ठेवणे यामुळेही पितृदोष तयार होतो. घरातल्या स्त्रियांचे चारित्र्य बिघडणे किंवा गैरवर्तन होणे यानेही हा दोष लागतो, तर भ्रूणहत्या करणे किंवा अकाली गर्भपात घडवून आणणे हे पितृदोषाचे मोठे कारण मानले जाते.