Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, दिशा सालियनला मी कधीही...
दिशा सालियन प्रकरणातील एफआयआरमध्ये नाव आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर भूमिका मांडली.
दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे. या प्रकरणाशी संबंधित एफआयआरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याचा दावा दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. सीबीआयला दिलेल्या जबाबात सतीश सालियन यांनी मंगळवारी आदित्य ठाकरेंसह काही बॉलिवूड कलाकार आणि पोलीस अधिकाऱ्यांचीही नावे घेतली होती. या जबाबानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आता आपली भूमिका जाहीरपणे मांडली आहे. दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही किंवा तिला ओळखतही नव्हतो, असे आदित्य ठाकरेंनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे. आपल्यावर होत असलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी या पोस्टमधून स्पष्टपणे नमूद केले आहे.
मोठमोठ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चा तथ्य बदलू शकत नाहीत, असे ठाकरे म्हणाले. अधिकृत फेरतपासणीला राजकीय हेतूने केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आरोपांपासून मुक्तपणे पुढे जाऊ दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. म्हणजेच या प्रकरणाची चौकशी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय आणि पूर्वग्रहाशिवाय व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, अफवांचा धुरळा उडवणे बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो. मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी आणि चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या सहा वर्षांपासून वारंवार या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा किंवा संबंध नसतानाही माझे नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.
कुठलेही तथ्य आणि सत्य नसलेले हे सततचे खोटे कॅम्पेन दुर्दैवी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. बोंबाबोंब करून केल्या जाणाऱ्या टीव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करू द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पोस्टच्या शेवटी आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला की, ज्यांना वाटत असेल की अशा चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने आम्हाला शांत बसवता येईल, तर तो त्यांचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.