दहिसर ते भाईंदर जोडणाऱ्या किनारा रस्त्याचे काम प्रगतीपथावर, डिसेंबर 2028 चे उद्दिष्ट
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पातील दहिसर - भाईंदर जोड रस्त्याचे काम सुरू असून, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी करत डिसेंबर 2028 पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास सुखकर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. वेसावे ते भाईंदर या नगरांना किनारा रस्त्याने जोडणारा हा प्रकल्प आंतरबदल आणि जोडरस्त्यांसह सुमारे 60 किलोमीटरचा आहे. संपूर्ण कामाची विभागणी ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर - भाईंदर जोड रस्ता (DBLR) अशा सात टप्प्यांत करण्यात आली आहे.
यातील दहिसर - भाईंदर जोड रस्ता हा मुंबई आणि मिरा भाईंदर परिसरासाठी महत्त्वाचा मानला जातो आणि सध्या त्याचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. या रस्त्यामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम दरम्यान थेट व जलद रस्ते संपर्क तयार होणार आहे. या रस्त्याची एकूण लांबी सुमारे 5.135 किलोमीटर असून, त्यात उन्नत मार्ग, खारफुटीच्या भागातील खांबांवरचा रस्ता, खाडीवरील उन्नत रचना, खारपाण जमिनीवरील उन्नत मार्ग, वाहतूक विखुरण्यासाठी जोडमार्ग व आंतरबदल तसेच उड्डाणपूल अशा विविध अभियांत्रिकी रचनांचा समावेश आहे.
या जोड रस्त्यातील 3.83 किलोमीटर लांबीचा आणि 45 मीटर रुंदीचा मुख्य उन्नत रस्ता हा मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचा अखेरचा भाग ठरणार आहे. याच कामाच्या ठिकाणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी भेट देऊन सुरू असलेल्या प्राथमिक कामांची माहिती घेतली. सध्या तिथे गॅबियन भिंतीचे कुंपण घालण्याचे काम सुरू असून, पुलाच्या पायासाठी पाइल्स (खोल पाया) आणि त्यावरील पाइल कॅप तयार करण्याचे काम चालू आहे.
आतापर्यंत 60 पायाभूत खांब, 5 पाइल कॅप, पुलाचे 4 आधारस्तंभ, आधारस्तंभाचा शीर्षभाग आणि पुलाचे 9 बांधकाम भाग असे काम पूर्ण झाले आहे. कामाच्या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून तात्पुरता प्रवेश पूल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँचिंग गर्डरचे काम सुरू होणार असल्याची माहिती बांगर यांनी घेतली.
पाहणीदरम्यान बांगर यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया प्राधान्यक्रम ठरवून वेगाने पूर्ण करावी, विविध प्राधिकरणांसह मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, सुरक्षाविषयक प्रमाणित कार्यप्रणालीचे (एसओपी) काळजीपूर्वक पालन करावे आणि काम सुरू असताना सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी डिसेंबर 2028 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन आणि अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले.