अमरावतीत एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांना दंड, आरटीओची मोहीम अधिक तीव्र
अमरावती आरटीओने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबवली असून, ८७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अमरावती जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी लावणे बंधनकारक असतानाही अनेक वाहनचालक हा नियम पाळत नव्हते. यावर प्रादेशिक परिवहन विभागाने म्हणजेच आरटीओने आता कठोर पावले उचलली आहेत. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान आरटीओने जिल्ह्यातील एकूण २६९० वाहनांची तपासणी केली. या तपासणीत एचएसआरपी नसलेली ९१९ वाहने आढळून आली आणि त्यांच्यावर कारवाई करत आतापर्यंत ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वास्तविक जुन्या वाहनांना एचएसआरपी बसवण्यासाठी शासनाने सुमारे पाच वेळा मुदतवाढ दिली होती. तरीही अनेक वाहनचालकांनी मुदत संपल्यानंतरही नवीन नंबर प्लेट बसवून घेतली नव्हती, हे तपासणीत उघड झाले. यामुळे आरटीओने नियम मोडणाऱ्यांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र केली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, शहर आणि जिल्ह्यात सहा भरारी पथके सातत्याने तपासणी करत असून, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ ई-चलानद्वारे कारवाई केली जात आहे.
जिल्ह्यात एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाईची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली सुमारे ३ लाख ८४ हजार वाहने अशी आहेत, ज्यांनी अजून एचएसआरपी प्लेट लावलेली नाही. ही सर्व वाहने आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील ७.५ लाख वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या वाहनांवर ही प्लेट नसेल त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. दंड भरण्याशिवाय एचएसआरपी प्लेट न लावलेल्या वाहनांचे पत्ता बदलणे, परवाना नूतनीकरण, वाहन हस्तांतरण यांसारखी आरटीओ कार्यालयातील महत्त्वाची कामेही पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
यापूर्वी नागरिकांकडून याबाबत मोठी उदासीनता दिसून आली होती. अनेकांनी ऑनलाइन नोंदणी केली, पण नंबर प्लेट अधिकृत केंद्रावर आल्यानंतरही ती बसवून घेतली नाही. त्यामुळे आजही अनेक वाहनांच्या एचएसआरपी प्लेट अधिकृत केंद्रांवर पंधरा-पंधरा दिवसांपासून पडून असल्याचे समोर आले आहे. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन विभागाने आधी पाच वेळा मुदत वाढवली होती, मात्र मुदत संपल्यानंतर आता नियमाची सक्तीने अंमलबजावणी सुरू झाली असून दंडात्मक कारवाईलाही वेग देण्यात आला आहे. आरटीओने वाहनधारकांना तातडीने एचएसआरपी बसवून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, ही तपासणी मोहीम पुढील काळातही अधिक कडकपणे सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.