अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नियोजित कोल्हापूर दौरा प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे अचानक रद्द करण्यात आला, ते हुबळीहून थेट दिल्लीकडे रवाना झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. शहा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या याच सल्ल्यानंतर ते कर्नाटकातील हुबळी येथून कोल्हापूरला न येता थेट नवी दिल्लीकडे रवाना झाले.
शहा हे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांचा हा दौरा आधीच नियोजित करण्यात आला होता. मात्र शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द करून थेट दिल्ली गाठली.
शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूर शहरात स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी शहरभर बॅनर आणि फलक लावले होते. स्थानिक पोलिस प्रशासनानेही कडक बंदोबस्तात दौऱ्याची तयारी आधीच करून ठेवली होती. पण दौरा रद्द झाल्याची बातमी समजताच शहरातील स्वागताचे फलक आणि बॅनर हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
अमित शहा यांच्या हस्ते हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात 'महालक्ष्मी ग्रीन एनर्जी' या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते. 'वेस्ट टू बेस्ट' आणि 'शून्य कचरा' या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पात ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यासोबतच कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथेही विविध विकासकामांचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार होते. हे सर्व कार्यक्रम आता त्यांच्या अनुपस्थितीत कसे पार पडतील, याकडे स्थानिक पातळीवर लक्ष लागले आहे.
भाजपचे स्थानिक आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने हुपरीतील या कार्यक्रमाची मोठी तयारी करण्यात आली होती. आता अमित शहा यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे कार्यक्रम नेमका कोणाच्या हस्ते होणार याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे.