सत्ताधारी एनडीएत मोठा वाद; समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून जेडीयू, चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरिक कायद्याबद्दल म्हणजेच यूसीसीबद्दल घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही घोषणा नवी दिल्लीत करण्यात आली आणि यानंतर भाजपच्या अनेक मित्रपक्षांनी यावर सावध भूमिका घेत आपले इशारे द्यायला सुरुवात केली आहे. समान नागरिक कायदा हा देशभरातील सर्व धर्मीयांसाठी एकच नागरी कायदा लागू करण्याचा प्रस्ताव असल्याने त्यावर वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
आंध्र प्रदेशात सत्तेत असलेल्या तेलगू देसम पार्टीच्या संसदीय दलाचे नेते कृष्ण देवरायालू यांनी स्पष्टपणे सांगितले की, या मुद्द्यावर अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र गरज पडली तर यावर विचार केला जाईल आणि हा कायदा स्वीकारण्याआधी सर्व संबंधित घटकांशी नक्कीच चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. म्हणजेच तेलगू देसम पार्टीने या मुद्द्यावर लगेच होकार किंवा नकार न देता सावध पवित्रा घेतला आहे.
बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत असलेल्या जेडीयूनेही या विषयावर अमित शाह यांच्याशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचा आणखी एक मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनीही याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आमचा पक्ष एकरूपता आणि विविधता या दोन्ही गोष्टींसाठी कटिबद्ध असून संविधानाने वेगवेगळ्या समुदायांच्या परंपरांना मान्यता दिली आहे, असे पासवान यांनी नमूद केले. यूसीसीचा मसुदा सगळ्यांसमोर आणला पाहिजे, संबंधित घटकांच्या हिताचा विचार व्हायला हवा आणि त्यावर व्यापक चर्चा व्हायला हवी, त्यानंतरच पक्ष आपली अंतिम भूमिका जाहीर करेल, असेही पासवान म्हणाले. याचाच अर्थ लोक जनशक्ती पार्टीने यूसीसीला थेट पाठिंबा किंवा विरोध न दर्शवता आधी सर्व बाजूंनी चर्चा व्हावी अशी भूमिका मांडली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रात यूसीसी लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अमित शाह यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी हिवाळी अधिवेशनात यूसीसी विधेयक आणण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार धर्मसंकटात सापडल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील मुस्लिम आमदार इद्रीस नायकवडी यांनी सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. नायकवडी यांनी सुनेत्रा पवार आणि तटकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रवादी हा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर आधारलेला पक्ष आहे, त्यामुळे यूसीसीबाबत पक्षाने आपली अधिकृत भूमिका लगेच स्पष्ट करावी.