अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी घेतली अबू सालेमची भेट? विहिंपच्या दाव्याने खळबळ
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात जाऊन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेम याची भेट घेतली, असा दावा विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या या दाव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे यांनी या भेटीवरून प्यारे खान यांच्या चौकशीची मागणी केली आहे. संवेदनशील घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे विहिंपने स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय आणि एनआयए या यंत्रणांमार्फत व्हावी, अशी मागणी विहिंपने केली आहे. यासंदर्भात नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. एवढेच नाही, तर अबू सालेमला भेटण्यामागचे नेमके कारण काय होते आणि या भेटीचे स्वरूप नेमके काय होते, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी विहिंपने केली आहे.
अमोल ठाकरे नेमकं काय म्हणाले, याबद्दल त्यांनी सांगितले की, प्यारे खान यांनी नाशिक येथील कारागृहात जाऊन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेम याची भेट घेतल्याचा दावा विहिंपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी व्हावी यासाठी विहिंपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
प्यारे खान यांनी नाशिक येथील कारागृहात जाऊन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याची भेट घेतली, त्यामुळे आम्ही चौकशीची मागणी केल्याचे अमोल ठाकरे म्हणाले. संवेदनशील घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत, त्यामुळे प्यारे खान यांना पदावरून हटवले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची सीबीआय आणि एनआयएमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी अमोल ठाकरे यांनी केली.