धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच केला मुलीचा 'तेरावा', VIDEO व्हायरल
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका कुटुंबाने आपल्याच मुलीचे ती जिवंत असतानाच अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्य प्रदेशातील उज्जैन इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुलै महिन्यात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. खाचरोड शहरातील नरसिंग मंदिर परिसरात एका कुटुंबाने आपल्याच मुलीचे ती जिवंत असतानाच अंत्यसंस्कार केले.
या टोकाच्या निर्णयामागचं कारण होतं मुलीने केलेला प्रेमविवाह. तिने कुटुंबाच्या परवानगीशिवाय आंतरजातीय मुलासोबत लग्न केलं होतं, आणि हीच गोष्ट कुटुंबाच्या जिव्हारी लागली. मुलगी आपल्या या निर्णयावर ठाम राहिली आणि कुटुंबाने तिला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले, पण मुलगी काही ऐकायला तयार झाली नाही. हे प्रकरण पुढे वाढत गेलं आणि अखेर पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. तिथे मुलीने आपल्या आई-वडिलांना आणि भावाला ओळखण्यासच स्पष्ट नकार दिला, असा दावा कुटुंबियांनी केला आहे. आपल्याच मुलीने अशा प्रकारे नातं तोडल्यामुळे कुटुंब प्रचंड संतापलं आणि त्यांनी अखेर तिच्या अंत्यसंस्काराच्या रूपात आपला राग व्यक्त केला.
समाजातील लोकांसमोर आणि नातेवाइकांच्या साक्षीने कुटुंबाने हे कठीण आणि टोकाचं पाऊल उचललं. घराच्या अंगणात मुलीचा फोटो ठेवून त्यांनी 'गोरनी' नावाचा विधी पार पाडला, आणि नंतर तिच्या फोटोला आग लावली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जे जे विधी सहसा केले जातात, ते सगळे या प्रसंगी करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या कुटुंबियांनी सांगितलं की त्यांनी मुलीला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलं होतं, पण तिच्या या कृतीनंतर ती जिवंत असूनही त्यांच्यासाठी जणू मरण पावल्यासारखीच झाली.
गोरनी ही काही समाजांमध्ये पाळली जाणारी एक प्रतीकात्मक आणि सामाजिक परंपरा आहे. या परंपरेनुसार, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या सदस्यावर तो जिवंत असतानाच, मृत माणून अंतिम संस्कार केले जातात. अशा सामाजिक विधींना कुठलाही कायदेशीर किंवा घटनात्मक आधार नाही, तरीही सध्या या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर याविषयी अनेक मतमतांतरं व्यक्त होत आहेत.
ही घटना एका एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली, ज्यात कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली होती. यावर अनेक युजर्सनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं, "त्या कुटुंबाला लाज वाटायला हवी." दुसऱ्या युजरने लिहिलं, "आणि अशा मागास मानसिकतेसह आपण विकास घडवणार आहोत का?" तर आणखी एका युजरने लिहिलं, "या देशात काहीही होणार नाही, आजही इथे इतके अशिक्षित लोक आहेत, हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं."