धीरजने रचला इतिहास, १६ वर्षांनी भारतीय पुरुष तिरंदाजाला वर्ल्ड कप सुवर्णपदक
भारतीय रिकर्व्ह तिरंदाज धीरज बोम्मादेवराने आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास घडवला.
भारताच्या रिकर्व्ह तिरंदाजीत एक मोठी गोष्ट घडली आहे. धीरज बोम्मादेवरा हा आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही धीरजचे अभिनंदन केले असून, कदाचित रिकर्व्ह तिरंदाजीत भारताचे सुवर्णयुग सुरू झाले असावे, असे त्यांनी म्हटले आहे.
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या पंचवीस वर्षीय धीरजने अंतिम फेरीत जपानच्या नाकानिशी जुन्याला रोमहर्षक शूट-ऑफमध्ये पराभूत केले. वीसाव्या क्रमांकावर असलेल्या नाकानिशीविरुद्ध हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. पाच सेटनंतर दोघांचेही गुण ५-५ असे बरोबरीत होते, त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी शूट-ऑफ खेळवण्यात आले. त्यात धीरजने १०-९ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सेटनिहाय गुण असे होते, २८-२८, २८-२९, २९-२८, २८-३०, २८-२७, आणि अंतिम निकाल ६-५ असा धीरजच्या बाजूने लागला. या विजयामुळे धीरजने २०२३ आणि २०२४ या दोन हंगामातील निराशाजनक कामगिरी मागे टाकली आहे. याच महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही धीरज सहभागी होणार आहे. २०२२ साली रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा एका सैनिकाला इतिहास घडवण्यासाठी फक्त एका बाणाची गरज होती, तेव्हा त्याने अचूक १० गुण मिळवले. धीरज बोम्मादेवरा आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये रिकर्व्ह विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ठरला, पण यामागे यापेक्षाही मोठी कहाणी असू शकते, असेही ते म्हणाले. गेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताने सहा सुवर्णपदके जिंकत कोरियाला मागे टाकले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. यंदाच्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भारतीय तिरंदाजांनी कोरिया आणि चीनसारख्या पारंपरिक बलाढ्य संघांना वारंवार धूळ चारली आहे. त्यामुळे भारतीय तिरंदाजी सुवर्णयुगाच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न विचारत, नक्कीच तसे वाटते आहे, असे मत महिंद्रा यांनी नोंदवले.
धीरजच्या या विजयामुळे भारतीय पुरुष रिकर्व्ह तिरंदाजीची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षाही संपली आहे. यापूर्वी २०१० साली एडिनबर्ग येथे कांस्यपदक जिंकणारे जयंत तालुकदार हे वर्ल्ड कप फायनलमध्ये पदक जिंकणारे शेवटचे भारतीय पुरुष रिकर्व्ह तिरंदाज होते. धीरजशिवाय वर्ल्ड कप फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी डोला बॅनर्जी ही एकमेव भारतीय खेळाडू आहे, तिने २००७ साली दुबईत महिलांचे वैयक्तिक विजेतेपद पटकावले होते. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम मात्र दीपिका कुमारीच्या नावावर आहे. आठ वेळा या स्पर्धेत सहभागी झालेल्या दीपिकाने पाच रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे.