'रामायण' चित्रपटाचं पहिलं गाणं 'जय जय राम' प्रदर्शित, रहमान यांचं संगीत, अरिजित-श्रेयाचा आवाज
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 'रामायण' चित्रपटाच्या संगीताला सुरुवात झाली असून पहिलं गाणं 'जय जय राम' प्रेक्षकांसमोर आलं आहे.
गणेश चतुर्थीचं औचित्य साधून बहुचर्चित 'रामायण' चित्रपटाच्या संगीताचा प्रवास सुरू झाला आहे. चित्रपटातलं पहिलं गाणं 'जय जय राम' आता प्रेक्षकांसाठी उपलब्ध झालं असून, त्यात श्रीरामांच्या नामस्मरणासोबत भावनिक संगीताचाही अनुभव मिळतो. श्रीगणेशाच्या आशीर्वादानं हे गाणं रिलीज करत निर्मात्यांनी संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली.
'जय जय राम' हे गाणं श्रीरामांना वाहिलेलं भक्तिगीत आहे. आरतीचा आध्यात्मिक बाज आणि सिनेमॅटिक संगीत यांचा मेळ या गाण्यात साधलेला दिसतो. संगीत दिलंय ए. आर. रहमान यांनी, तर गाणं लिहिलंय डॉ. कुमार विश्वास यांनी. अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांनी आपल्या आवाजातून या गाण्याला भावपूर्ण रूप दिलं आहे.
गाण्याच्या शब्दांमधून श्रीरामांची करुणा, संरक्षण आणि धर्मपालन यांची झलक दिसते. 'जय जय राम' हे शब्द वारंवार गाण्यात येत राहतात, त्यामुळे भक्तिभाव अधिक ठळक होतो.
या गाण्याची वैशिष्ट्यं अशी - रहमान यांचं संगीत, कुमार विश्वास यांची शब्दरचना, अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांचा आवाज, आरती आणि सिनेमॅटिक संगीताचा मिलाफ आणि श्रीरामांशी वैयक्तिक नातं जोडणारी भावना.
चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी सांगितलं की श्रीराम हे 'रामायण'च्या केंद्रस्थानी आहेत. पिढ्यान्पिढ्या भारतीय संस्कृतीत श्रीरामांकडे मार्गदर्शक म्हणून बघितलं जातं, असं त्यांनी नमूद केलं. अंधाराच्या क्षणी श्रीरामांकडून सामर्थ्य मागितलं जातं, अनिश्चिततेच्या वेळी त्यांच्या मार्गाकडे बघितलं जातं आणि आनंदाच्या क्षणी कृतज्ञतेनं त्यांचं स्मरण केलं जातं, असं मल्होत्रा म्हणाले. याच नात्यातून 'जय जय राम' हे गाणं तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं.
ए. आर. रहमान यांनी सांगितलं की या गाण्याच्या मुळाशी श्रीरामांच्या नामस्मरणाची साधी पण प्रभावी भावना आहे. प्रार्थनेची शुद्धता कायम ठेवत ती चित्रपटगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांनी कुमार विश्वास यांचे शब्द आपल्या आवाजातून साकारले असून, गाणं ऐकताना प्रेक्षकांना मनःशांती मिळावी आणि त्यांचं गाण्याशी वैयक्तिक नातं तयार व्हावं, अशी अपेक्षा रहमान यांनी व्यक्त केली.
डॉ. कुमार विश्वास यांच्या मते 'जय जय राम' या तीन शब्दांतच संपूर्ण प्रार्थना सामावलेली आहे. श्रीरामांचं वर्णन करण्याऐवजी प्रत्येक भक्ताचं त्यांच्याशी असलेलं नातं शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. भाषा साधी आणि थेट ठेवली, कारण खरी भक्ती कोणत्याही अलंकाराची गरज नसते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रामायण'च्या ध्वनिचित्रफितीला जगभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता आणि अवघ्या सहा दिवसांत विविध डिजिटल माध्यमांवर एक अब्जाहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यानंतर आता पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत आहे, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. नमित मल्होत्रा यांच्या Prime Focus Studios तर्फे, DNEG आणि यश यांच्या Monster Mind Creations यांच्या सहकार्यानं चित्रपटाची निर्मिती होत आहे. भारताबाहेरील वितरण Sony Pictures बघत आहे. 'रामायण: भाग १' हा दोन भागांच्या मालिकेतील पहिला भाग असून तो दिवाळी २०२६ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.