विदर्भात आज पावसाचा इशारा, राज्यात मात्र कोरडे वातावरण; शेतकरी चिंतेत
राज्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट, हवामान विभागाकडून आज विदर्भातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात सगळीकडे मुसळधार पावसाची वाट पाहिली जात असताना पावसाने मात्र चांगलीच ओढ दिली आहे आणि याचा मोठा फटका खरीप पिकांना बसतो आहे. पाऊस बराच काळ गायब असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड चिंतेचे वातावरण आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उरलेल्या राज्यात मात्र ऊन-सावलीचा खेळ सुरू राहणार असून तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पडतील. दुसरीकडे देशात शनिवार म्हणजेच 19 सप्टेंबरपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा, म्हणजेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
15 सप्टेंबर रोजी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांत काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याखेरीज जालना आणि बीड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र काही भागांत ऊन-सावलीच्या खेळादरम्यान हलक्या सरी येतील, पण बहुतांश जिल्ह्यांत पावसाची पूर्ण उघडीपच कायम राहणार आहे.
पुढील चार दिवसांचा विचार केला तर राज्यात पाऊस गायब राहण्याचीच शक्यता जास्त आहे. बुधवारी काही ठिकाणी हलक्या सरींची हजेरी असेल. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस संपूर्ण भागात नसून अगदी मर्यादित ठिकाणीच असेल, त्यामुळे बहुतांश भागांत कोरडे वातावरणच राहणार आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबरच्या सुमारास पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक परिस्थिती तयार होते आहे. यंदा संपूर्ण देशात मॉन्सून एक दिवस उशिरा, म्हणजेच 9 जुलै रोजी पोहोचला होता. आता तो आपल्या दीर्घकालीन सरासरी वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचे संकेत आहेत.
यंदाच्या मॉन्सूनचा प्रवासही काहीसा लांबलेला होता. 4 जून रोजी मॉन्सूनने केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांत प्रवेश केला होता. त्यानंतर 6 जून रोजी त्याने तळ कोकणात धडक दिली. कोकणात दाखल झाल्यानंतर मात्र मॉन्सूनची पुढची वाटचाल बरीच अडखळत झाली होती. अखेर 29 जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. देशातील इतर भागांतही अडखळत झालेली वाटचाल पूर्ण करत अखेर 9 जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशात पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.