राज्यातील 11 जिल्ह्यांत आज पावसाचा यलो अलर्ट, विदर्भ-मराठवाड्यात जोर वाढणार
ऑगस्टमध्ये पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्यानं आणि सप्टेंबरचा आठवडा उलटूनही अनेक भागांत पावसाची वाट बघितली जात असताना, हवामान खात्यानं आज 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
ऑगस्ट महिन्यात जितका पाऊस पडायला हवा होता तितका पडला नाही, आणि सप्टेंबर सुरू होऊन एक आठवडा उलटला तरी राज्यातल्या बऱ्याच भागांत पावसानं ओढ दिली आहे. पण आता हवामानात बदल होणार असल्याचं चित्र दिसतंय आणि वेगवेगळ्या भागांत पावसाच्या सरी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज, 11 सप्टेंबरला राज्यातल्या 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात आज सगळ्यात जास्त जिल्ह्यांना अलर्ट मिळाला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांत आज यलो अलर्ट असून, तिथं 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागात हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे होऊ शकतात. बुलढाणा, अमरावती, अकोला आणि वाशिममध्ये आज अलर्ट नसला तरी वातावरण बदलण्याची शक्यता आहे, आणि उद्या विदर्भातल्या बहुतेक भागांत यलो अलर्ट मिळण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचं दिसतंय. नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथं 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह हलका, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिवमध्येही हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याही मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचं वातावरण राहील असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, तिथं 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहू शकतात आणि काही ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो. नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याचा अंदाज आहे. पुढचे दोन दिवस हा बदल कायम राहील असं सांगण्यात आलं आहे.
कोकणात सध्या काही ठिकाणी हलक्या सरी सुरू असल्या तरी 11 सप्टेंबरसाठी या भागाला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. उद्यापासून मात्र इथंही वातावरण बदलू शकतं आणि 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी पुढचे दोन दिवस यलो अलर्ट मिळण्याची शक्यता असल्यानं पावसाची वाट बघणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रात सध्या काही भागांत कोरडं आणि उकाड्याचं वातावरण आहे. कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूरसाठी आज कोणताही अलर्ट नाही, पण काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जना होऊ शकते. सध्या तरी जोरदार पावसाचा इशारा नाही, पण उद्यापासून वातावरण बदलण्याचे संकेत आहेत.
एकंदरीत, बरेच दिवस पाऊस थांबल्यानंतर आता वातावरणात बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. आज 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट असून, उद्या राज्यातल्या बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळं पावसाची जी तूट झाली आहे ती काही प्रमाणात भरून निघेल का आणि खरीप हंगामाला दिलासा मिळेल का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
पुढच्या दहा दिवसांच्या तापमानाच्या अंदाजानुसार, 12 सप्टेंबरला शनिवारी कमाल तापमान 31 अंश सेल्सियस आणि किमान 26 अंश सेल्सियस राहील. 13 सप्टेंबरला रविवारी कमाल 29 आणि किमान 27 अंश, 14 सप्टेंबरला सोमवारी कमाल 30 आणि किमान 26 अंश, 15 सप्टेंबरला मंगळवारी कमाल 33 आणि किमान 26 अंश असेल. 16 सप्टेंबरला बुधवारी कमाल 32 आणि किमान 27 अंश, 17 आणि 18 सप्टेंबरला गुरुवार-शुक्रवारी कमाल 32 आणि किमान 26 अंश, 19 सप्टेंबरला शनिवारी कमाल 32 आणि किमान 26 अंश, तर 20 आणि 21 सप्टेंबरला रविवार-सोमवारी कमाल 33 आणि किमान 26 अंश सेल्सियस राहील असा अंदाज आहे.