काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा धक्का, 8 वर्षांच्या मुलीसह दोघांचा मृत्यू
लालबागच्या काळाचौकीत गणेशोत्सवाच्या गर्दीत विजेचा धक्का लागून एक चिमुरडी आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले.
मुंबईतील गणेशोत्सवाच्या जल्लोषात काळाचौकी परिसरात घडलेल्या एका दुर्घटनेने शोककळा पसरवली आहे. लालबाग येथील काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा धक्का लागल्यामुळे 8 वर्षांच्या एका मुलीसह दोघांचा जीव गेला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यापैकी तिघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाजवळ मध्यरात्री ही घटना घडली. गणेशोत्सवामुळे लालबाग परिसरात भाविकांची तोबा गर्दी होती आणि या गर्दीतच विजेचा धक्का लागल्याने एकच खळबळ उडाली. धक्का बसल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काही वेळ मंडप परिसरात गोंधळाचे वातावरण होते. डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
या दुर्घटनेत रागिनी घनश्याम यादव या 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याखेरीज किरण अकबर नाइक, तन्मवी नरेश हांडे, साहिल संदीप तारे आणि रूही सिंह हे जखमी झाले. जखमींचे वय 12 ते 19 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा ग्लोबल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे मृतांचा आकडा दोनवर पोहोचला.
मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की ते रात्री दोनच्या सुमारास गणपती दर्शनासाठी आले होते. परिसरात मोठी गर्दी असल्यामुळे त्यांनी परत जायचे ठरवले. दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडताना मंडपाच्या बाजूला असलेल्या एका दुकानाजवळ ते थांबले होते. रांगेतील इतर भाविकांना जागा देण्यासाठी ते बाजूला उभे होते आणि त्याच ठिकाणी लाइट लावलेल्या होत्या. याच जागी विजेचा धक्का लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या दुर्घटनेमुळे गणेशोत्सव मंडपांमधील वीज व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंडपातील विद्युत व्यवस्था करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे नातेवाईकांनी नोंदवले. "गणपती बसवता, पण सुरक्षेची काळजी घेतली जात नाही," असे शब्द वापरून त्यांनी संताप व्यक्त केला. आपली चिमुकली गमावल्याचे दुःख शब्दांत मांडणे कठीण असल्याची भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडपांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे विद्युत जोडणी, वायरिंग, मंडपातील उपकरणे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य व्यवस्था असणे खूप महत्त्वाचे ठरते. काळाचौकीतील या दुर्घटनेमुळे गणेशोत्सव मंडळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.