IND vs AFG: दुसऱ्या टी-२० त वरूण चक्रवर्तीच्या जागी बिश्नोईला संधी, सूर्यवंशीबाबत संभ्रम कायम
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा टी-२० सामना, वरूण चक्रवर्ती दुखापतीमुळे बाहेर
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे. पहिला सामना टीम इंडियाने आधीच जिंकलेला आहे. साधारणपणे कर्णधार विजयी संघात बदल करणं टाळतात, पण आज मात्र टीम इंडियाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये किमान एक बदल करावाच लागणार आहे. पहिल्या सामन्यात न खेळलेल्या वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का, हा प्रश्न अजूनही कायम आहे. याचं उत्तर संध्याकाळी ७ वाजता कळेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात उतरेल. पहिल्या सामन्याप्रमाणेच हा सामनासुद्धा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र सामन्याच्या फक्त एक दिवस आधी स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती संघाबाहेर गेल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच तो दुखापतीतून बरा झाला होता, पण आता पुन्हा एकदा जखमी झाला आहे. बीसीसीआयने अजून त्याच्या बदली खेळाडूची अधिकृत घोषणा केलेली नाही, पण रवी बिश्नोईला आज संधी दिली जाऊ शकते असं मानलं जातंय. वरुणच्या अनुपस्थितीत बिश्नोई हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. म्हणजेच प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान एक बदल निश्चित आहे.
वैभव सूर्यवंशीने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडमध्ये खेळून पदार्पण केलं होतं, पण अजूनपर्यंत त्याने भारतात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. इंग्लंडमधल्या पदार्पणानंतर तो झिम्बाब्वेविरुद्धही खेळला होता, मात्र भारत-अफगाणिस्तान मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.
पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सलामीची जबाबदारी सांभाळली होती. अभिषेकच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला विजय मिळाला, पण संजू सॅमसनला मात्र यावेळीही कोणतीही मोठी खेळी करता आली नाही. संजूने आठ चेंडूंत १० धावा केल्या आणि तो बाद झाला.
कर्णधार श्रेयस अय्यर वैभवला भारतातला त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी देणार, की संजू सॅमसन याही सामन्यात खेळणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र जर संजूला अंतिम ११ मधून वगळलं गेलं, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा इशान किशन यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकतो. हा निर्णय कदाचित आधीच घेतला गेला असेल, पण त्याची अधिकृत माहिती संध्याकाळी ७ वाजता, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील, तेव्हाच समोर येईल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ असा आहे: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई.