हरतालिका व्रत नेमकं काय, पार्वतीने शंकरांसाठी केलेल्या तपश्चर्येची कथा
भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जाणारं हरतालिका व्रत आणि त्यामागची पौराणिक कथा.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत केलं जातं. हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी केलं होतं, आणि यामध्ये कठोर तपश्चर्येची आठवण दडलेली आहे. हरतालिका या शब्दातच याचा अर्थ लपलेला आहे - हरत म्हणजे हरण करून नेणे आणि आलिका म्हणजे सखी. पार्वतीच्या सखीने तिला घरातून दूर नेलं, म्हणून या व्रताला हरतालिका असं नाव पडलं असं सांगितलं जातं.
या कथेनुसार, पूर्वजन्मी सतीने आपल्या वडिलांच्या यज्ञात आत्मधन केलं होतं. त्यानंतर तिचा पुनर्जन्म हिमालय आणि नेना यांची कन्या पार्वती म्हणून झाला. लहानपणापासूनच पार्वतीच्या मनात भगवान शंकरांबद्दल अपार भक्ती होती आणि तिने त्यांनाच पती म्हणून स्वीकारण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे लहान वयातच ती शंकरांची उपासना आणि तपश्चर्या करू लागली.
एके दिवशी नारदमुनी हिमालय राजाच्या दरबारात आले आणि त्यांनी पार्वतीच्या विवाहासाठी भगवान विष्णूंचा प्रस्ताव मांडला. विष्णूंसारखा श्रेष्ठ वर मिळतोय म्हणून हिमालय राजाने आनंदाने होकार दिला. पण ही बातमी पार्वतीला समजली तेव्हा ती खूप दुखी झाली, कारण तिच्या मनात शंकरांशिवाय कोणाचाही विचार नव्हता.
पार्वतीची ही अवस्था पाहून तिच्या जिवलग सखीने तिला याबद्दल विचारलं. पार्वतीने आपल्या मनातली इच्छा सखीला सांगितली, तेव्हा सखीने तिला घरातून दूर एका घनदाट जंगलात नेलं. हिमालय राजाला वाटलं की कोणीतरी पार्वतीचं अपहरण केलंय, आणि याच घटनेमुळे पुढे पार्वतीचं नाव हरतालिका असं प्रसिद्ध झालं.
जंगलात एका नदीकिनारी पार्वतीने वाळूचं शिवलिंग तयार केलं. पाणीसुद्धा न घेता तिने निर्जळी उपवास केला आणि मनोभावे शंकरांची पूजा केली. दिवसभर अन्नपाणी सोडून ती शिवनामाचा जप करत राहिली, आणि रात्रभर जागून तिने शिवध्यान केलं. तिची भक्ती, श्रद्धा आणि तपश्चर्या इतकी तीव्र होती की संपूर्ण सृष्टी प्रभावित झाली. अखेर पार्वतीच्या या अखंड तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिच्यासमोर प्रकट होऊन त्यांनी वर मागण्यास सांगितलं. पार्वतीने नम्रपणे त्यांनाच पती म्हणून मिळावं अशी इच्छा व्यक्त केली.
शंकरांनी तिची इच्छा मान्य केली आणि योग्य वेळी विवाह करण्याचं वचन दिलं. दरम्यान हिमालय राजा आपल्या मुलीचा शोध घेत जंगलात आला आणि त्याने पार्वतीला घरी परत येण्याची विनंती केली. तेव्हा पार्वतीने स्पष्टपणे सांगितलं की, शंकरांशी विवाह करण्याचं वचन दिलं तरच ती परत येईल. मुलीचा हा निर्धार पाहून हिमालय राजाने तिची इच्छा मान्य केली, आणि शुभ मुहूर्तावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा भव्य विवाह पार पडला.
हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता, तर शक्ती आणि शिव यांच्या मिलनाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच हरतालिका व्रत हे अखंड सौभाग्य, उत्तम पतीची प्राप्ती आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.