गणेशोत्सवात मोदक खाताय? जास्त खाल्ल्यास साखर आणि वजन वाढण्याचा धोका, तज्ज्ञांचा सल्ला
गणेशोत्सवात मोदक आणि गोड पदार्थांवर ताव मारण्याआधी आहारतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला वाचा.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि या दिवसांत घरोघरी मोदक, लाडू, पुरणपोळी, करंजी अशा गोडाधोडाच्या पदार्थांवर ताव मारला जातो. पण एकाच दिवशी अनेक ठिकाणी जाणे आणि अनेक आमंत्रणे स्वीकारल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त खाणे सहज होऊन जाते, आणि विशेषतः मधुमेह असणाऱ्यांनी या काळात आहाराकडे जरा जपून लक्ष द्यायला हवे. मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ फौजिया अन्सारी यांनी सणासुदीत जास्त गोड खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात, याबद्दल माहिती दिली आहे.
त्यांच्या मते आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण प्रमाण आणि संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. जास्त मिठाई खाल्ल्याने रक्तातील साखर वारंवार वाढू शकते, विशेषतः मधुमेह किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स असणाऱ्यांमध्ये हा धोका जास्त असतो. जास्त साखर आणि कॅलरीमुळे पुढे जाऊन वजन वाढणे, ट्रायग्लिसराइड्स वाढणे आणि फॅटी लिव्हरचा धोकाही वाढू शकतो. शिवाय तळलेले आणि जड पदार्थ खाऊन त्यावर भरपूर मिठाई खाल्ली तर अॅसिडिटी, पोट फुगणे, आळस आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे एखादा मोदक किंवा मिठाई खाल्ल्यावर तिथेच थांबणे योग्य, केवळ आवड आहे म्हणून जास्त खात राहणे बरोबर नाही असे त्या सांगतात.
एका मध्यम आकाराच्या उकडीच्या मोदकात साधारण 150 ते 200 कॅलरी असतात. मोदक मोठा असेल किंवा त्यात गूळ, नारळ आणि तूप जास्त असेल तर कॅलरी 200 पेक्षा जास्तही होऊ शकतात. उकडीचा मोदक तळलेला नसल्यामुळे तळलेल्या मोदकापेक्षा तो तुलनेने बरा पर्याय ठरतो. हिशोब मांडायचा झाल्यास 3 मोदक म्हणजे साधारण 450 ते 600 कॅलरी आणि 5 मोदक म्हणजे 750 ते 1,000 कॅलरी इतक्या होतात. जास्त मोदक खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते, कारण गूळ नैसर्गिक गोड असला तरी तो साखरमुक्त नाही. यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण वाढते, मधुमेह किंवा प्री-डायबेटीस असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी, तसेच वजन वाढणे आणि पोट फुगण्यासारख्या पचनाच्या तक्रारीही होऊ शकतात.
दिवसातून 1 ते 2 मध्यम आकाराचे उकडीचे मोदक खाणे सुरक्षित मानले जाते. जर 3 ते 4 मोदक खायचेच असतील तर त्या दिवशी इतर मिठाई टाळावी आणि मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. मधुमेह, लठ्ठपणा किंवा इतर मेटाबॉलिक तक्रारी असतील तर किती मोदक खाणे योग्य आहे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
गणेशोत्सवात निरोगी राहण्यासाठी दिवसभर वारंवार मिठाई खाण्याऐवजी एक ठराविक प्रमाण ठरवून तेवढेच खावे. सणाच्या पदार्थांसाठी नेहमीचे जेवण टाळू नये आणि एखाद्या कार्यक्रमाला जाण्याआधी खूप वेळ उपाशी राहू नये, कारण जास्त भूक लागली की जास्त खाल्ले जाते. भाज्या, डाळी, प्रथिने आणि संपूर्ण धान्ये असलेले संतुलित जेवण पोट जास्त वेळ भरलेले ठेवते, त्यामुळे नातेवाईकांकडे मिठाई समोर आल्यावर ती किती खायची यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. गोड पेयांवर अवलंबून न राहता दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. मधुमेह, लठ्ठपणा किंवा वाढलेले कोलेस्टेरॉल असल्यास पदार्थांच्या प्रमाणाबाबत जास्त काळजी घ्यावी. फरसाण, नमकीन, समोसा, वडा, भजी असे तळलेले पदार्थही शक्यतो टाळावेत. जड सणाचे जेवण झाल्यावर आळस आणि अस्वस्थपणा टाळण्यासाठी 10 ते 15 मिनिटे हलके चालणे फायद्याचे ठरते, आणि रोज नियमित व्यायाम करण्याची सवय ठेवावी असा सल्ला आहे.