विसर्जनानंतर मागे न बघण्याची प्रथा नेमकी कशामुळे, वाचा यामागचं कारण
गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये असं मोठी माणसं का सांगतात, याबद्दलची माहिती.
बाप्पा घरी आला की घर कसं भरल्यासारखं वाटतं. ढोल-ताशे, आरती, मोदक यांनी वातावरण आनंदी होऊन जातं. पण विसर्जनाचा दिवस जवळ आला की मन जड व्हायला लागतं. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस बाप्पा घरी राहतो आणि मग त्याला निरोप द्यायची वेळ येते. हा क्षण प्रत्येकासाठी भावनिक असतो.
प्रत्येक घरात विसर्जनाची पद्धत वेगळी असते. कोणी उत्तरपूजा करतं, कोणी आरती करून नैवेद्य दाखवतं, अक्षता वाहतं आणि मग "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. पण विसर्जनाच्या वेळी एक प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडतो, तो म्हणजे विसर्जन झाल्यावर मागे वळून बघावं की नाही. मोठी माणसं नेहमी सांगतात की विसर्जनानंतर मागे वळून बघू नका. पण असं का सांगतात, यामागे काही ठोस कारण आहे की केवळ एक समज आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
यामागचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण भावनिक आहे. बाप्पा दहा दिवस घरात असतो, रोज त्याची पूजा होते, त्याच्याशी बोललं जातं. तो घरातलाच एक सदस्य बनून जातो. त्यामुळे त्याला पाण्यात सोडताना मनाला वाईट वाटणं स्वाभाविक असतं. विसर्जनानंतर मागे वळून बघितलं तर तो मोह सुटत नाही आणि बाप्पाला अजून थोडा वेळ थांबवावं असं वाटत राहतं. म्हणूनच निरोप दिल्यावर मागे वळू नका, मोहात अडकू नका असं सांगितलं जातं. बाप्पा गेला हे मनाला समजावून, पुढच्या वर्षी तो परत येणार या आनंदात घरी परतावं, अशी यामागची भावना आहे.
दुसरी एक मान्यता अशी सांगितली जाते की बाप्पा जाताना घरातलं दुःख, अडचणी आणि संकटं सोबत घेऊन जातो. तो विघ्नहर्ता असल्यामुळे सगळी विघ्नं दूर करतो, असं मानलं जातं. विसर्जनानंतर मागे वळून पाहिलं तर ती दुःखं पुन्हा घरी बोलावली जातात, असा समज आहे. त्यामुळे बाप्पा गेल्यावर मागे न बघता सरळ घरी जावं, म्हणजे घरातली नकारात्मकताही त्याच्यासोबत निघून जाईल आणि नवीन आशा घेऊन घरी परतता येईल.
मात्र कोणत्याही मोठ्या ग्रंथात असा उल्लेख नाही की मागे वळून पाहिल्याने पाप किंवा दोष लागतो. हा काही ठोस नियम नसून पूर्वापार चालत आलेली एक लोकपरंपरा आहे. एखाद्या पाहुण्याला स्टेशनवर सोडायला गेल्यावर तो गेल्यानंतर आपण जास्त वेळ तिथे थांबत नाही, तसंच हे आहे. एकदा निरोप दिला की विषय तिथेच संपवायचा असतो, त्याचाच विचार करत बसायचं नसतं.
विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची मनोभावे उत्तरपूजा करावी, आवडता नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. विसर्जन करताना मनापासून "पुढच्या वर्षी लवकर या" असं म्हणावं. बाप्पाला पाण्यात विसर्जित केल्यानंतर नमस्कार करून मागे न वळता घरी यावं. घरी आल्यावर हातपाय धुवावेत आणि घरात थोडी साफसफाई करावी, कारण असं मानलं जातं की बाप्पा गेल्यावर घरात पुन्हा सकारात्मकता येते. शेवटी हा श्रद्धेचा विषय असून मागे वळून बघितल्याने बाप्पा रागावत नाही. निरोप देताना मनात योग्य भाव असणं आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेऊन जातो, हाच विचार महत्त्वाचा आहे.