Davis Cup 2026: पहिला सेट एकतर्फी, दुसऱ्यातही गेम ओव्हर! सरळ सेटमध्ये सुमित नागलचा पराभव; भारताचं आव्हान संपलं
सेऊलमधील ऑलिम्पिक टेनिस कोर्टवर दक्षिण कोरियाने भारताला १-३ असे नमवले, आणि डेविस कप २०२६ मधील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
डेविस कप २०२६ स्पर्धेतून भारताचे आव्हान संपले आहे. सेऊलच्या ऑलिम्पिक टेनिस कोर्टवर झालेल्या लढतीत दक्षिण कोरियाने भारताला १-३ असे नमवले आणि या स्पर्धेतून भारताला बाहेरचा रस्ता दाखवला. १९ सप्टेंबर रोजी सेऊल येथील ऑलिम्पिक टेनिस कोर्टवर झालेल्या या टायमधील एकेरीच्या चौथ्या सामन्यात सुमित नागलचा सामना कोरियाच्या सूनवू क्वॉनशी झाला होता, ज्यात नागलला सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
या लढतीचा पहिला सेट अगदी एकतर्फी झाला. सूनवू क्वॉनने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत ६ गेममध्ये ५-१ अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे नागलला या सेटमध्ये पुनरागमनाची संधीच मिळाली नाही आणि सहावा गेम गमावल्यावर त्याने ६-१ असा पहिला सेट गमावला. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी झालेल्या एकेरीच्या सामन्यातही नागलचा पराभव झाला होता, मात्र त्या सामन्यात त्याने चांगला खेळ दाखवला होता. भारताने दुसऱ्या फेरीतील या चौथ्या सामन्यासाठी नागलला मैदानात उतरवले होते.
पहिला सेट हातातून गेल्यानंतर नागल दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक करेल अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र सूनवू क्वॉनने ती संधीही त्याला दिली नाही. या सेटमध्ये एका टप्प्यावर चार गेमनंतर सामना २-२ असा बरोबरीत होता, पण त्यानंतर कोरियन खेळाडूने सलग चार गेम जिंकत ६-२ अशा फरकाने सेट आणि सामना दोन्ही खिशात घातले. या विजयासह दक्षिण कोरियाने डेविस कपच्या अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले, तर या पराभवामुळे भारताचा या स्पर्धेतील प्रवास थांबला. १९९६ नंतर प्रथमच डेविस कपच्या अव्वल आठ संघांत स्थान मिळवण्याचा भारताचा प्रयत्न यंदाही अपुराच राहिला.
पहिल्या दिवशी झालेल्या दोन्ही एकेरी सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे टायच्या सुरुवातीलाच भारत ०-२ असा मागे पडला होता. दुसऱ्या दिवशी टायमध्ये टिकून राहण्यासाठी भारताला दोन्ही सामने जिंकणे गरजेचे होते. पुरुष दुहेरीच्या सामन्यात दक्षिणेश्वर सुरेश आणि श्रीराम बालाजी या जोडीने जी सुंग नाम आणि उइसुंग पार्क या कोरियन जोडीला ६-३, ३-६, ६-३ अशा फरकाने हरवत भारताला एक विजय मिळवून दिला. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला होता, निकी पूनाचाच्या ऐवजी दक्षिणेश्वर सुरेशला संधी देण्यात आली होती. मात्र दुहेरीतील हा विजय पुरेसा ठरला नाही, कारण एकेरीच्या चौथ्या सामन्यात नागलचा पराभव झाल्याने भारताचे या टायमधील आणि पर्यायाने डेविस कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.