ब्रश करूनही तोंडाला वास येतोय? दुर्लक्ष करू नका, ही असू शकतात कारणे
दात घासल्यानंतरही तोंडातून घाणीचा वास येत असेल तर त्यामागे जिभेवरचा थर, हिरड्यांचे आजार किंवा कोरडेपणा असू शकतो. वेळीच लक्ष दिलं नाही तर इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सकाळी उठल्यावर तोंडातून वास येणं ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. पण नीट ब्रश केल्यानंतरही जर तोंडाला घाण वास येत राहिला, तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार सुरू करावेत. जिभेवर साचलेला थर, हिरड्यांचे आजार, दात किडणे, तोंड कोरडं पडणं आणि दातांच्या फटीत अडकलेले अन्नाचे बारीक कण या सगळ्या गोष्टींमुळे तोंडाच्या समस्या वाढत जातात. बरेच जण हा वास लपवण्यासाठी माऊथ वॉश किंवा मिंटच्या गोळ्या वापरतात. वैद्यकीय भाषेत या समस्येला हॅलिटोसिस असं म्हटलं जातं. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं.
सकाळी उठल्यावर तोंडाला वास का येतो, हे समजून घेण्यासाठी आधी लाळेचं काम समजून घ्यायला हवं. तोंडातली लाळ ही एक नैसर्गिक क्लीनिंग सिस्टीमसारखी काम करते - ती अन्नाचे कण वाहून नेते, ॲसिडिटी कंट्रोलमध्ये ठेवते आणि जिवाणूंची वाढ रोखते. पण रात्री झोपेत असताना लाळ तयार होण्याचं प्रमाण, घास गिळण्याची क्रिया आणि जिभेची हालचाल खूप कमी होते, त्यामुळे तोंड कोरडं पडतं. हिरड्यांच्या आजूबाजूला असणारे जिवाणू या वेळी अन्नाचे उरलेले कण, लाळ आणि मृत पेशींमधली प्रथिनं तोडायला लागतात. यातून हायड्रोजन सल्फाईड आणि मिथाईल मर्कॅप्टन नावाचे सल्फरयुक्त, दुर्गंधीयुक्त वायू तयार होतात आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर तोंडाला घाणेरडा वास येतो.
पण ब्रश केल्यानंतरही वास कायम राहत असेल, तर त्यामागे वेगळी कारणं असू शकतात. जिभेवर साचलेला जिवाणूंचा थर, दातांमध्ये वाढलेल्या फटी, हिरड्यांचे आजार, हिरड्यांमधून रक्त येणं, कृत्रिम दात-क्राउन किंवा ब्रिज नीट स्वच्छ न होणं, आणि तोंडात सतत जाणवणारा कोरडेपणा - या सगळ्यांमुळे ब्रश केल्यावरही दुर्गंधी टिकून राहते.
या समस्येवर उपाय म्हणून दिवसातून दोन वेळा ब्रश करणं गरजेचं आहे, यामुळे तोंडातले जिवाणू कमी होऊन वास कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट वापरावी. टंग स्क्रॅपरने जिभेचा मागचा भाग हळुवारपणे साफ केला तर जिभेवर साचलेला पांढरा थर निघून जातो. भरपूर पाणी पिणं आणि शरीराला आवश्यक पोषक आहार घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. माऊथ वॉश हा फक्त तात्पुरता सुगंध देतो, कायमचा उपाय नाही. त्यामुळे दातांची समस्या वाढल्याचं जाणवलं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करून घ्यावेत.