अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने अफगाणिस्तानचा धुव्वा, भारताने अवघ्या १३.४ ओव्हरमध्ये जिंकला सामना
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानवर ७ विकेट्सने मात केली.
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधाराने जाहीर केले की या निर्णयाला अनुसरून प्लेइंग इलेव्हनमध्ये वैभव सूर्यवंशीला जागा मिळाली नाही, तर जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले.
अफगाणिस्तानची सुरूवात अजिबात चांगली झाली नाही. अवघ्या ७ षटकांत ४३ धावांवर संघाचे निम्मे फलंदाज माघारी परतले होते. बुमराहने पहिल्याच षटकात पहिली विकेट घेत भारताला उत्तम सुरूवात करून दिली, तर वरूण चक्रवर्तीनेही चांगली गोलंदाजी केली. मात्र अझमतुल्ला उमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी सहाव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली आणि संघाला या धक्क्यातून सावरले. या भागीदारीमुळेच अफगाणिस्तानच्या संघाला १५० धावांचा टप्पा ओलांडता आला. उमरझाई ६४ धावांवर नाबाद राहिला आणि त्याच्याच जोरावर अफगाणिस्तानने २० षटकांत १५६ धावांपर्यंत मजल मारली. अर्शदीपने भारतासाठी तीन बळी घेतले.
१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच धक्का बसला. वैभव सूर्यवंशीला डावलून त्याच्या जागी संजू सॅमसनला आज खेळण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने मैदानात उतरवले होते. मात्र संजू सॅमसन केवळ १० धावा करून बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला, यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. मात्र दुसऱ्या टोकाला अभिषेक शर्माने सुरूवातीपासूनच डावाची सूत्रे हाती घेतली आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना अजिबात डोकं वर काढू दिलं नाही.
संजू सॅमसन बाद झाल्यानंतर त्याच्या जागी मैदानात उतरलेल्या इशान किशननेही अभिषेकपाठोपाठ आक्रमक फलंदाजी केली. दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतिषबाजी करत चाहत्यांना सामन्यात मजा आणून दिली आणि सामना खिशात घातला. अभिषेक शर्माने अवघ्या ३२ चेंडूंत ८२ धावा फटकावल्या, यात एका षटकात त्याने एकट्याने २६ धावा वसूल केल्या. पॉवरप्लेमध्येच भारताने ८२ धावा उभारल्या होत्या. अभिषेक बाद झाल्यानंतर इशान किशनही ४२ धावा करून बाद झाला. यावेळी रशीद खानने एका हाताने त्याचा अत्यंत कठीण झेल टिपत चाहत्यांचे मन जिंकून घेतले.
अखेर भारताने हा सामना ७ विकेट्सने आणि केवळ १३.४ ओव्हरमध्ये जिंकला.