अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी वरळी आणि दादर भागात तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतील वाहतूक पोलिसांनी वरळी आणि दादर परिसरात वाहतुकीत काही तात्पुरते बदल केले आहेत. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने हे नियोजन करण्यात आले आहे. गर्दी आणि संभाव्य कोंडी लक्षात घेता, या दोन्ही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आधीच पावले उचलली आहेत.
वरळी वाहतूक विभागाने जी.एम. भोसले मार्गावर सम-विषम पार्किंगची व्यवस्था लागू केली आहे. प्र.के. कुरणे चौक ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी आणि अस्ताव्यस्त पार्किंगवर आळा घालण्यासाठी २४ तास नो पार्किंग तसेच तारखेनुसार सम-विषम पार्किंगची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच एका दिवशी रस्त्याच्या एका बाजूला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूला पार्किंगला परवानगी असेल, अशी ही पद्धत आहे. हा बदल २० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून १८ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहे. जी.एम. भोसले मार्गाच्या दक्षिण आणि उत्तर वाहिनीवर सम-विषम पार्किंगची पद्धत सर्व वाहनांसाठी लागू राहणार आहे.
दुसरीकडे, अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दादर भागातही पाच ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. दादर वाहतूक विभागाच्या हद्दीत येणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, एस. के. बोले रोड, गोखले रोड दक्षिण आणि उत्तर, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी रोड आणि अप्पासाहेब मराठे मार्ग हे रस्ते या बदलांमध्ये समाविष्ट आहेत. अंगारकी संकष्टीच्या दिवशी या भागांत भाविकांची मोठी गर्दी होत असते, त्यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढतो. हा ताण कमी करण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत या पाच ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
२९ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने श्री सिद्धिविनायक मंदिर आणि आसपासच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गर्दीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच या भागातील रस्त्यांवरील वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलली आहेत आणि गर्दी तसेच कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईकरांनी आणि विशेषतः वरळी व दादर भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या तात्पुरत्या वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांनीही गर्दीचा अंदाज घेऊन वेळेचे नियोजन करावे आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.