विदर्भात पुढचे 15 दिवस पावसाची शक्यता नाही, नागपूर वेधशाळेचा शेतकऱ्यांना सल्ला
राज्यभरातला बळीराजा अजूनही पावसाची वाट बघतोय, अशातच शेतकऱ्यांची काळजी अजून वाढवणारी बातमी समोर आलीये. पुढच्या 15 दिवसांत विदर्भात मान्सूनचा पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता नसल्याचं नागपूर वेधशाळेनं सांगितलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाची वाट न बघता सिंचनाच्या दुसऱ्या पर्यायांवर लक्ष द्यावं, असा सल्ला वेधशाळेकडून देण्यात आलाय.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला की विदर्भाला मान्सूनचा पाऊस मिळतो. पण सध्या पुढच्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरात असा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची कुठलीच शक्यता दिसत नाहीये, अशी माहिती नागपूर वेधशाळेचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली. सध्या अल निनोचा प्रभाव कायम असून सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले. स्थानिक हवामानामुळे इथे-तिथे थोडाफार पाऊस पडू शकतो, पण मान्सूनचा जोरदार पाऊस पुढची दोन आठवडे तरी पडणार नाही, असं प्रवीण कुमार यांनी स्पष्ट केलं.
प्रवीण कुमार यांनी पुढे सांगितलं की, पुढच्या काही दिवसांत पावसाची शक्यता खूपच कमी आहे. कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. पुढचे चार-पाच दिवस पावसाची शक्यता जवळपास नाहीच, कुठेच पाऊस पडण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. पुढचे 15 दिवस पाऊस येणार नसल्यानं शेतकऱ्यांनी आता पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं. अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीये. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभरात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलंय. अल निनोच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिनाही कोरडा जाणार, असा अंदाज जागतिक हवामान संस्थेनं गेल्या महिन्यात दिला होता, तो आता पूर्णपणे खरा ठरलाय असं रोहित पवार यांनी नमूद केलं. सध्या संपूर्ण हंगाम वाया गेला असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय, असं ते म्हणाले. सध्याच्या दुष्काळाची परिस्थिती अतिशय भयानक असून ती दिवसेंदिवस अजून बिकट होत जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये तर शेतमजुरांना किमान 25 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केलीये. सरकार आज याबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.