शाळकरी मुलीच्या प्रश्नातून सुरुवात, सांगलीच्या दामलेंनी यंदा घडवल्या ९६ गणेशमूर्ती
लॉकडाऊनमध्ये दुकान बंद पडलं आणि एका शाळकरी मुलीच्या साध्या प्रश्नातून सांगलीचे नरेंद्र दामले यांचा मूर्तीकलेचा प्रवास सुरू झाला, जो आज ९६ गणपतींपर्यंत पोहोचला आहे.
सांगलीत राहणारे नरेंद्र दामले यांची यंदाची गणेशोत्सवाची तयारी जरा वेगळी आहे. त्यांनी यंदा तब्बल ९६ गणपतींच्या मूर्ती स्वतःच्या हाताने घडवल्या आहेत. पण या प्रवासाची सुरुवात मात्र एका छोट्याशा घटनेतून झाली होती, ते म्हणजे लॉकडाऊनचा तो कठीण काळ.
दामले सांगतात की लॉकडाऊनमध्ये त्यांचं दुकान बंद राहिलं, उत्पन्न थांबलं आणि बरंच काही नुकसान झालं. घरातली पुस्तकंही रद्दीत गेली. अशा वेळी काहीतरी करावं असा विचार मनात घोळत होता. त्याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या एका मुलीला शाळेसाठी गणपती हवा होता. तिने दामलेंना विचारलं, "काका, तुम्हाला येते का? मला काही येत नाहीये." या साध्या प्रश्नानेच त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं.
दामले म्हणतात की त्यांनी याआधी कधीच गणपतीची मूर्ती केली नव्हती. लहानपणी नागोबा, बैल आणि किल्ले बनवायचे, पण गणपती हा पहिलाच अनुभव होता. चित्रकला आणि स्केचिंगची आवड असल्याने शरीराचं प्रमाण, डोकं, हात यांचा अंदाज त्यांना आधीपासूनच होता. त्याच जोरावर त्यांनी पहिली मूर्ती घडवली आणि ती खूपच सुंदर उतरली. हीच मूर्ती त्यांच्या कलाप्रवासाची खरी सुरुवात ठरली.
पहिली मूर्ती सगळ्यांनाच आवडल्यामुळे पुढच्या वर्षीपासून घरीच तयार केलेली मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला. मग दरवर्षी संख्या वाढतच गेली. पहिल्या वर्षी एक मूर्ती, दुसऱ्या वर्षी ३२, त्यानंतर ४५, मग ७२ आणि यंदा तब्बल ९६ गणपती त्यांनी घडवले आहेत. हे सगळं काम ते स्वतः करतात, फक्त रंगकाम आणि इतर छोट्या कामांमध्ये कुटुंबीय मदत करतात.
दामले यांचं गणपतीचं काम फक्त उत्सवाच्या दिवसांपुरतं मर्यादित नाही. गणपती संपल्यानंतर साधारण महिन्याभराने येणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावरच ते पुढच्या वर्षीच्या गणपतीच्या कामाला सुरुवात करतात. त्यामुळे जवळपास ११ महिने त्यांचा हा कारखाना सुरू असतो.
ते स्वतःच्या मूर्तींचे साचेही स्वतः तयार करतात. बाजारातून एक फुटी गणपतीचा साचा घ्यायचा झाल्यास सुमारे ४५०० रुपये खर्च येतो, पण नुसत्या साच्याने मूर्ती पूर्ण होत नाही, असं ते सांगतात. साच्यातून फक्त मूर्तीची बॉडी तयार होते, त्यानंतर हात, सोंड, किरीट आणि बाकीचे बारकावे कलाकाराला हातानेच करावे लागतात.
दामले हे काम केवळ कमाईचं साधन मानत नाहीत. कला जोपासायची, गणपतीची सेवा करायची आणि त्या कामाचं मानधन घ्यायचं, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त यावर चालवणं सोपं नसल्याचंही ते स्पष्टपणे सांगतात, त्यासाठी कुटुंबातील सगळ्यांना हे काम यायला हवं आणि मूर्तींची संख्याही वाढायला हवी. आधी दुकान सांभाळत मूर्ती बनवायचं काम चालायचं, पण आता दुकान पूर्णपणे बंद करून पुढच्या वर्षापासून पूर्ण वेळ मूर्तीनिर्मितीलाच द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
जवळपास ४५-४६ वर्षांनंतर आपण पुन्हा मातीत हात घातला, असं दामले सांगतात. लहानपणी मुलांसाठी किल्ले वगैरे करायचे, पण गणपतीची मूर्ती कधीच केली नव्हती. लॉकडाऊनमधला तो एक छोटासा प्रयत्न आज इथपर्यंत घेऊन आला, असं ते नमूद करतात. एका शाळकरी मुलीच्या गणपतीपासून सुरू झालेला हा प्रवास आज ९६ गणरायांच्या रूपात उभा आहे.