Mobile Prices : आता मोबाईल फोन देखील महागले, या मोबाईल फोन्सच्या किंमतीत होणार वाढ, काय आहे मुख्य कारण
Realme, OnePlus, Poco आणि Lava या ब्रँड्सनी आपल्या फोनच्या किंमती वाढवल्या असून मेमरी चिपचा तुटवडा हे यामागचं मुख्य कारण सांगितलं जातंय.
नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर थोडं थांबून हे वाचा, कारण मोबाईल फोनच्या किंमतीत आता चांगलीच वाढ झाली आहे. भारतातल्या मोबाईल मार्केटमध्ये सध्या Realme, OnePlus, Poco आणि Lava या ब्रँड्सच्या फोनला सगळ्यात जास्त मागणी आहे आणि नेमक्या याच कंपन्यांनी आपल्या फोनच्या किंमती वाढवल्या आहेत. एकूणच मोबाईल फोनच्या किंमतीत १५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे म्हणून Realme, Lava आणि OnePlus सारखे ब्रँड लोकांच्या पसंतीचे आहेत. सामान्य लोकांना हे फोन विकत घेणं शक्य होतं म्हणूनच लोक अशा फोनला जास्त पसंती देतात. पण आता हेच फोन महाग होणार आहेत. कंपन्यांनी सांगितलं की मोबाईलच्या पार्ट्सच्या किंमती वाढल्यामुळे आणि पुरवठा साखळीत अडचणी आल्यामुळे ही दरवाढ करावी लागली. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे मेमरी चिपचा तुटवडा आणि वाढलेला उत्पादन खर्च असल्याचं सांगितलं जातंय.
भारतात स्मार्टफोन घ्यायचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. "अजून काही दिवस थांबून घेऊ" असा विचार करणाऱ्या लोकांना मोबाईल कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. Realme, OnePlus, Poco आणि Lava सारख्या लोकप्रिय ब्रँड्सनी आपल्या प्रमुख मॉडेल्सच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत. या दरवाढीमागचं मुख्य कारण म्हणजे जागतिक पातळीवर मेमरी चिप्सचा तुटवडा. DRAM आणि NAND सारख्या महत्त्वाच्या स्टोरेज चिप्सच्या किंमती वाढल्यामुळे स्मार्टफोन बनवण्याचा खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम भारतीय मार्केटवर दिसतोय, विशेषतः मिड-रेंज फोनच्या किंमती हजारो रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.
सध्या Realme 16 Series ची बाजारात चांगलीच चर्चा आहे. Realme 16 Pro+ 5G मॉडेलच्या काही व्हेरिएंटची किंमत तब्बल 7,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय OnePlus 15R मॉडेलची किंमतही वाढवण्यात आली आहे. Poco X8 Pro Max आणि Lava Agni 4 हे फोनसुद्धा आता नव्या किंमतीत विकले जात आहेत. या सगळ्याच लोकप्रिय मॉडेल्सच्या किंमतीत झालेली ही वाढ सामान्य ग्राहकांच्या बजेटवर परिणाम करणारी ठरली आहे.
नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करणाऱ्या ग्राहकांचं आता सगळं लक्ष सध्याच्या ऑफर्स आणि जुन्या किंमतीत उपलब्ध असलेल्या स्टॉककडे लागलं आहे. स्मार्टफोन आताच घ्यावा की आणखी वाट पाहावी, या गोंधळात ग्राहक अडकले असून त्यामुळे भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण तयार झाल्याचं दिसतंय. जुन्या किंमतीत मिळणारा स्टॉक संपण्याआधी फोन घ्यावा की नवी किंमत स्थिर होण्याची वाट पाहावी, याचा निर्णय आता ग्राहकांनाच घ्यावा लागणार आहे.