फरक्का पाणी वादावरून NDAत तणाव? सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची तातडीची बैठक
JDUचे राज्यसभा खासदार संजय झा यांच्या 'सत्ता राहो वा न राहो' या वक्तव्यानंतर बिहारच्या राजकारणात हालचाली वाढल्या असून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी भाजप कोट्यातील मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. फरक्का जल करार या मुद्द्यावरून JDU आक्रमक भूमिका मांडत असतानाच मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीसाठी भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे मंत्री सध्या पाटणा किंवा बिहारच्या बाहेर आहेत, त्यांनाही तातडीने पाटण्यात बोलावण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते. या अचानक बोलावलेल्या बैठकीमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पक्षाच्या पातळीवर या बैठकीचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या तयारीशी जोडला जात आहे. पण सध्याच्या राजकीय घडामोडी बघता बैठकीच्या वेळेबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. JDUने फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका आणि राज्यसभा खासदार संजय झा यांचे वक्तव्य यानंतर ही बैठक होत असल्याने त्याकडे राजकीय नजरेतून बघितले जात आहे.
JDUकडून बिहारच्या विविध जिल्ह्यांत 'फरक्का जल संधि पर नीतीश संवाद' असे कार्यक्रम घेतले जात आहेत. बेगूसरायमधील अशाच एका कार्यक्रमात संजय झा यांनी फरक्का कराराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. "सत्ता रहे या ना रहे, बिहार के पानी से समझौता नहीं करेंगे," असे ते म्हणाल्याची माहिती आहे. या वक्तव्यानंतर बिहारमध्ये JDU आणि भाजपच्या भूमिकांवरून राजकीय चर्चा सुरू झाली.
संजय झा यांच्या म्हणण्यानुसार, 1996 पासून फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर बिहारवर अन्याय होत आहे. पावसाळ्यात बिहारच्या अनेक भागांना पुराचा सामना करावा लागतो, तर राज्याला पाण्याची गरज असताना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळत नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे फरक्का जल कराराच्या पुनर्विचाराचा मुद्दा JDUकडून अधिक आक्रमकपणे मांडला जात आहे. या मुद्द्यावरून केंद्रातील NDA सरकारवरही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
बिहारमध्ये NDA सरकारमध्ये भाजप आणि JDU हे प्रमुख घटक पक्ष आहेत. अशा परिस्थितीत JDUच्या वरिष्ठ नेत्याकडून 'सत्ता राहो वा न राहो' असे वक्तव्य आल्यानंतर राजकीय निरीक्षकांचे लक्ष दोन्ही पक्षांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी फक्त भाजप कोट्यातील मंत्र्यांची बैठक बोलावल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र ही बैठक NDAमधील मतभेदांशी संबंधित असल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही.
भाजपचे सर्व मंत्री बैठकीला हजर राहणार असल्याने या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, फरक्का जल कराराबाबत भाजपची भूमिका काय राहणार आणि JDUच्या वक्तव्यांवर चर्चा होते का, याकडे बिहारच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या बैठकीमागे पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची तयारी हे कारण सांगितले जात असले, तरी बिहारमधील बदलत्या राजकीय वातावरणामुळे या बैठकीला विशेष महत्त्व मिळाले आहे.