पनवेल-कर्जत प्रवास होणार सुसाट; 497 कोटींच्या दुपदरीकरणाला मंजुरी
मध्य रेल्वेवरील चौक-कर्जत विभागाच्या दुपदरीकरण प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळाली असून पनवेल-चौक-कर्जत मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतुकीला याचा मोठा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेवरील चौक-कर्जत या रेल्वे विभागाच्या दुपदरीकरण प्रकल्पाला भारतीय रेल्वेने अधिकृत मंजुरी दिली आहे. हा विभाग 10.86 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवरील या विभागाला महत्त्वाचा मानले जाते. या निर्णयामुळे पनवेल-चौक-कर्जत परिसरातील दळणवळण व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.
पनवेल-चौक-कर्जत हा मार्ग प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही बाबतीत अत्यंत वर्दळीचा आणि रेल्वेच्या दृष्टीने धोरणात्मक महत्त्वाचा मानला जातो. मात्र आतापर्यंत चौक-कर्जत हा पट्टा एकेरी मार्ग होता. एकेरी मार्ग असल्याने गाड्यांच्या फेऱ्यांवर आणि वाहतूक क्षमतेवर मर्यादा येत होती. त्यामुळे अनेकदा गाड्यांना नाहक थांबे घ्यावे लागत आणि प्रवाशांचा वेळ वाया जात असे. रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक व्यापक योजना हाती घेतली आहे. या व्यापक योजनेचा भाग म्हणून आता चौक-कर्जत या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असून प्रवाशांना त्याचा थेट फायदा मिळेल. या प्रकल्पामुळे प्रत्येक दिशेने दररोज किमान पाच अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवणे शक्य होणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुकर होईल असे सांगितले जात आहे.
प्रवाशांबरोबरच मालवाहतुकीलाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. या दुपदरीकरणामुळे प्रतिवर्षी तब्बल 18.35 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक हाताळण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यासोबतच मालगाड्यांचे नाहक थांबे आणि विलंब कमी होण्यास मदत होणार आहे. मालगाड्यांचे थांबे आणि विलंब कमी झाल्याने संपूर्ण रेल्वे वेळापत्रक अधिक गतिमान आणि शिस्तबद्ध होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
देशभरात रेल्वे नेटवर्क बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून दुपदरीकरण, तिपदरीकरण, चौपदरीकरण, उड्डाणपूल आणि बायपास मार्ग असे विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. चौक-कर्जत प्रकल्पाची मंजुरी हा याच व्यापक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पनवेल ते कर्जत हा प्रवास अधिक सुरक्षित, विनाअडथळा आणि वेगवान होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.