पाण्यासाठी पाकिस्तानी जवानांमध्येच जुंपली, एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
पाकिस्तानातील अप्पर साऊथ वझिरिस्तान भागात पाण्याच्या टँकरवरुन जवानांमध्ये वाद होऊन थेट हाणामारी झाल्याचा दावा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पाकिस्तानात अन्नधान्याची टंचाई तर सर्वांनाच माहीत आहे, पण आता तिथे पाण्याचीही टंचाई समोर येत आहे. याच टंचाईतून घडलेली एक घटना सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे. एक व्हिडिओ शेअर होतोय, ज्यात पाकिस्तानी सैनिक पाण्यासाठी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना खैबर पख्तुनख्वाच्या अप्पर साऊथ वझिरिस्तान भागातील असल्याचा दावा केला जातोय.
सुरुवातीला पाण्याच्या टँकरवरुन वाद सुरु झाला आणि बघता बघता याचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. परिस्थिती इतकी बिघडली की एसएसजी, फ्रंटियर कॉर्प्स म्हणजेच FC आणि गुप्तचर विभागाच्या जवानांमध्ये आपसातच हाणामारी झाली. या भांडणात एकूण २२ जवान जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेचं अधिकृत कन्फर्मेशन अजून आलेलं नाही, पण व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर वेगाने फिरतोय.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत अनेक जवान एकमेकांवर हल्ला करताना, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारताना दिसतात. व्हिडिओतील माणसांची संख्या आणि मारहाणीची तीव्रता बघता हे प्रकरण किती गंभीर असेल याचा अंदाज येतो. आसमान मांजा या भागात जवानांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय, तिथे रोज टँकरनेच पाणी पुरवलं जातं. याच भागात टँकर आल्यानंतर आधी SSG आणि गुप्तचर विभागाशी संबंधित जवानांमध्ये वाद सुरु झाला आणि नंतर प्रकरण इतकं चिघळलं की जवान एकमेकांना मारहाण करु लागले. बराच वेळ हा वाद आणि मारामारी पाण्यावरुन सुरु होती.
ट्विटरवर एका युजरने या घटनेबद्दल लिहिलं की, "पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वातील अप्पर साऊथ वझिरिस्तानमधल्या आसमान मांजा मिलिट्री ब्रिगेडमध्ये पाण्याच्या कमतरतेवरुन SSG कमांडो, आर्मी, FC आणि FIU चे जवान आपसात भिडले."
दक्षिण वझिरिस्तान हा भाग फार पूर्वीपासूनच पाणीटंचाईने त्रस्त आहे. इथले ६० टक्के लोक टँकरच्याच पाण्यावर अवलंबून आहेत. मर्यादित पाणी टँकरमधून येतं तेव्हा वाद होणं इथे नवीन नाही, आणि याच व्हिडिओतही तसंच घडलं. रोज ठराविक प्रमाणातच पाणी येत असल्यामुळे ते आधी घेण्यावरुन आणि कोणाला किती मिळणार यावरुन जवानांमध्ये आधीपासूनच अस्वस्थता होती, असं यावरुन दिसून येतं. जवानांची ही पाण्यासाठीची भांडणं बघून अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. एका युजरने लिहिलं, "पाण्यासाठी सैनिकांमध्येच अशी मारामारी होणं खरंच वाईट आहे." दुसऱ्या युजरने लिहिलं, "देशाची सुरक्षा करणारे जवानच पाण्यासाठी भांडताना दिसतायत, ही दुर्दैवी बाब आहे." तर आणखी एका युजरने लिहिलं, "पाकिस्तान तर खरंच भिकारी झालाय."