मेघना एरंडे-जोशी: 'सनई चौघडे'मुळे यंदा कोकणातला गणेशोत्सव पहिल्यांदाच अनुभवला
अभिनेत्री मेघना एरंडे-जोशी यांनी यंदाच्या गणेशोत्सवातील खास आठवणी आणि बाप्पासोबतच्या नात्याबद्दल भावुक होत सांगितलं.
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री मेघना एरंडे-जोशी हिच्यासाठी गणेशोत्सव हा नुसता सण नाही, तर लहानपणापासूनच्या आठवणी, घरच्या परंपरा आणि बाप्पासोबतच्या खास मैत्रीचा भाग आहे. एरंडे कुटुंबातल्या गणेशोत्सवापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास, लग्नानंतर जोशी कुटुंबातल्या परंपरांमधून पुढे जात आता 'सनई चौघडे' मालिकेच्या निमित्ताने परब कुटुंबाचा गणेशोत्सवही अनुभवण्यापर्यंत पोहोचला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे 'सनई चौघडे'च्या शूटिंगमुळे मेघनाने पहिल्यांदाच कोकणातला गणेशोत्सव जवळून पाहिला. याआधी ती कधीच कोकणात गेली नव्हती. याबद्दल बोलताना ती म्हणाली, "यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आतापर्यंत मी फक्त एरंडे आणि जोशी असे दोनच गणेशोत्सव साजरे करत होते. पण या वर्षीपासून परबांचा गणेशोत्सवही साजरा करणार आहे."
तिच्या माहेरी लहानपणापासूनच गणेशोत्सवाची परंपरा आहे. घरातली सगळ्यात लहान मुलगी असल्यामुळे गणपतीच्या आगमनानंतर तिला प्रसाद वाटण्यासारखी छोटी कामं दिली जायची. लग्न होऊन जोशी कुटुंबात आल्यावर तिने स्वयंपाकापासून गणेशोत्सवातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या शिकून घेतल्या. आता गणपती स्थापनेची पूजाही ती स्वतः करू शकते.
'सनई चौघडे' मालिकेत हरतालिकेपासून गौरीपर्यंतचा गणेशोत्सव दाखवण्यात आला आहे. "कोकणात झालेल्या गणेशोत्सवाच्या या शूटिंगमुळे माझा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे," असं मेघना म्हणाली. मालिकेतला हा गणेशोत्सव प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार असल्याचंही तिने सांगितलं. टीमला गणेशगल्लीच्या राजाच्या पाद्यपूजनासाठी नेल्यापासूनच त्यांचा गणेशोत्सव सुरू झाला होता, त्यामुळे यंदाचा उत्सव तिच्यासाठी अधिकच खास ठरला.
गणेशोत्सवाशी मेघनाचं नातं तिच्या बालपणापासूनचं आहे. वयाच्या सातव्या वर्षी गणेश मंडळाच्या स्टेजवर तिचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स झाला होता आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास आता ३८ वर्षांपर्यंत पोहोचला आहे. यंदा तिला जोशी गणपती, एरंडे गणपती आणि परब गणपतीची आरती करण्याची संधी मिळाली. याआधी तिने झी मराठीच्या 'उत्सव गणेशाचा' या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हर दिला होता, पण यंदा निवेदिता सराफ आणि हर्षदा खानविलकर यांच्यासोबत आरती करण्याची संधी मिळाल्यामुळे हा क्षण तिच्यासाठी विशेष ठरला. "ज्या ज्या गोष्टींचं मी स्वप्न पाहिलं, त्या त्या गोष्टी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझ्यासाठी सत्यात उतरत आहेत," असं ती भावुक होत म्हणाली.
गणेशोत्सवाच्या काळात घरातली विविध कामं करण्यात मेघनाला आनंद मिळतो. नैवेद्य बनवणे, आरती म्हणणे, गणपतीच्या गोष्टी वाचणे, पूजेची आणि आरतीची तयारी करणे आणि पाहुण्यांना बोलावणे, ही सगळी कामं ती मनापासून करते. तिला मोदक बनवायलाही खूप आवडतं. या काळात माहेरचे आणि सासरचे पाहुणे घरी येत असल्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण असतं. हरतालिकेच्या कार्यक्रमात मंगळागौरीचे खेळ खेळल्याची आठवणही तिने सांगितली. 'बाल गणेश'साठी डबिंग केल्यामुळे गणपतीच्या अनेक गोष्टी तिला हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत माहीत आहेत आणि गणेशोत्सवाच्या काळात ती वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभागी होते तसंच होस्टिंगही करते.
गणपती बाप्पासोबतचं आपलं नातं फक्त श्रद्धेपुरतं नसून मैत्रीचं असल्याचं मेघना सांगते. रात्रीची आरती झाल्यावर ती काही वेळ एकटी बाप्पासमोर बसते. "रात्रीची आरती झाल्यानंतर मी १०-१५ मिनिटं एकटी बाप्पासमोर बसते. तेव्हा माझ्या आणि बाप्पामध्ये गप्पा असतात," असं ती सांगते. गणपतीच्या डोळ्यांत तिला जिवंतपणा जाणवतो आणि त्यामुळे कोणत्याही गणपतीची मूर्ती पाहताना त्याचे डोळे तिला विशेष भावतात. विसर्जनाच्या वेळी तिचं मन भरून येतं आणि पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाची ती आतुरतेने वाट बघते.
मेघनाच्या आयुष्यात गणपती बाप्पाला खास स्थान आहे. "स्वामी आणि बाप्पा हे माझे दोन इष्ट आहेत," असं ती सांगते. लहानपणापासून कुठल्याही प्रोजेक्टची सुरुवात करण्याआधी ती 'गणपती बाप्पा मोरया' म्हणते आणि शूटिंग पॅकअप करतानाही तिची टीम हाच जयघोष करते. मोठं संकट येण्याआधीच बाप्पा मदत करतात, असा तिचा विश्वास आहे आणि बाप्पाने आपल्याला अनेक कठीण प्रसंगांतून बाहेर काढल्याचं ती सांगते.
तिच्या बालपणीची एक खास आठवणही तिने सांगितली. तिच्या शेजारी राहणाऱ्या आठवले आजी सिद्धिविनायक मंदिरात मुख्य आचारी होत्या आणि त्या रोज मेघनासाठी सिद्धिविनायकाचा गजरा आणि प्रसादातला मोदक आणायच्या. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंत ती रोज केसांत सिद्धिविनायकाचा गजरा घालून शाळेत जायची आणि तिच्या डब्यातही सिद्धिविनायकाचा प्रसाद असायचा. ही आठवण आजही तिच्या मनात तितकीच खास आहे.
२०१० मध्ये लग्न झाल्यापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाचा योग तिला आला नाही, पण यंदा 'सनई चौघडे'च्या टीमसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्याची तिची इच्छा आहे. २०१० पासून ती दरवर्षी आपल्या मुलीला घेऊन पवईतल्या गणपतींच्या दर्शनाला आवर्जून जाते. गणपतीच्या दर्शनातून नवी ऊर्जा आणि चेतना मिळते, असंही ती सांगते. "माझं आणि बाप्पाचं एक वेगळं, निरागस, निखळ असं मैत्रीचं नातं आहे आणि ते कायम असंच राहील. गणपती बाप्पा मोरया!" अशा शब्दांत तिने बाप्पावरील आपली श्रद्धा व्यक्त केली.