राज्यात पावसाचा जोर वाढणार, आज 24 जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट
मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात राज्याच्या हवामानात पुन्हा बदल, हवामान विभागाकडून कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी इशारा.
मान्सून आता शेवटच्या टप्प्यात असला तरी राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल घडायला सुरुवात झाली आहे. राज्यभरात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही, पण पुढच्या काही दिवसांत अनेक भागांत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यासाठी राज्यातील 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा, तर तुरळक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट मिळाला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, तसेच हलक्या ते मध्यम सरींसह काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना मात्र कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही, तरीही तिथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज कायम आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांनाही सध्या अलर्ट नाही, पण या भागातही हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरात मात्र हवामान अधिक सक्रिय राहील, तिथे 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती अधिक गंभीर दिसते. अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींसोबतच तुरळक भागांत जोरदार पाऊसही अपेक्षित आहे.
मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव अशा सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, तसेच काही ठिकाणी वादळी पावसासह जोरदार सरी कोसळू शकतात. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना मात्र अलर्ट नसून तिथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातही पावसाचा इशारा कायम आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडेल असा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार सरींचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकूणच मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात राज्याचे हवामान पुन्हा सक्रिय होताना दिसते आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत अनेक भागांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, तर मराठवाड्यात हा बदल तीन ते चार दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. राज्यात अजूनही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने, प्रत्यक्षात किती पाऊस पडतो याकडे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.