राज्यात पुन्हा पावसाचा जोर, 30 जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट
काही दिवस उघडीप दिल्यानंतर राज्यात पावसाने पुन्हा एन्ट्री केली असून, 12 सप्टेंबरला जवळपास 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गेले काही दिवस उसंत घेतलेला पाऊस आता पुन्हा राज्यात सक्रिय झाला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसासाठी पोषक अशी सिस्टीम तयार होत असून, पुढच्या दोन दिवसांत अनेक भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 12 सप्टेंबरला राज्यातल्या बहुतांश भागांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
कोकणाचा विचार केला तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट मिळाला आहे. इथे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी मात्र कोणताही अलर्ट दिलेला नाही, तिथे फक्त तुरळक हलक्या सरींचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथा भागासाठी यलो अलर्ट लागू आहे. इथे वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विशेष म्हणजे धुळे आणि नंदुरबारसाठी दुसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे, म्हणजे तिथला धोका आणखी वाढणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, पुण्याचा घाटमाथा आणि सोलापूर भागालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीसाठी अलर्ट नसला तरी लोकल पातळीवर पावसाच्या सरी आणि वादळी वारे येऊ शकतात असं सांगितलं जातं आहे.
मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. इथे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, सोबत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते जोरदार पाऊस अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
विदर्भातसुद्धा पावसाचा जोर लक्षणीय राहणार आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. इथेही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, या सगळ्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर 12 सप्टेंबरला राज्यातल्या बहुतेक भागांत यलो अलर्ट असून, कुठे हलका तर कुठे मध्यम पाऊस, तर काही भागांत जोरदार सरींचा अंदाज आहे. पुढचे दोन दिवस हेच हवामान कायम राहणार असं सांगितलं जातं आहे. बरेच दिवस पाऊस थांबल्यानंतर आता पुन्हा सुरू झालेल्या सरींमुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जरा दिलासा मिळाला आहे. पण हा पाऊस नेमका किती दिवस टिकणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
तापमानाबद्दल बोलायचं तर 13 सप्टेंबरला कमाल 29 आणि किमान 27 अंश सेल्सियस, 14 सप्टेंबरला कमाल 30 आणि किमान 26 अंश, 15 सप्टेंबरला कमाल 33 आणि किमान 26 अंश असा अंदाज आहे. त्यानंतर 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान कमाल तापमान साधारण 32 ते 33 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26 ते 27 अंश सेल्सियसच्या आसपास राहील असं सांगितलं जातं आहे.