गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठातील भूपती नियुक्तीवर कुलगुरूंचे स्पष्टीकरण
आत्मसमर्पित माओवादी भूपती याची गोंडवाना विद्यापीठात समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याने वाद, कुलगुरूंनी दिले उत्तर.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेला माओवादी भूपती उर्फ वेणुगोपाल याची गोंडवाना विद्यापीठाच्या एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याचं समोर आल्यावर जिल्ह्यातील ग्रामसभांनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणावर अखेर गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने खुलासा केला आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितलं की, भूपती याची नियुक्ती जाहिरात, कागदपत्रांची तपासणी आणि मुलाखत या प्रक्रियेतूनच फक्त तीन महिन्यांसाठी करण्यात आली आहे. त्याच्याकडे फक्त ऑफिसच्या कामाची जबाबदारी देण्यात आली असून, ग्रामसभा किंवा प्रशिक्षणात कुठल्याही विषयावर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याला दिली नसल्याचं कुलगुरूंनी स्पष्ट केलं.
एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रासाठी तीन समन्वयक नेमण्याचा निर्णय 9 जुलैला विद्यापीठाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झाला होता. त्यानंतर 11 ऑगस्टला समन्वयक पदासाठी थेट मुलाखतीची जाहिरात विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली. आलेल्या अर्जांची छाननी झाल्यावर पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. 14 ऑगस्टला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या मुलाखती घेतल्या. मुलाखती पूर्ण झाल्यावर 29 ऑगस्टला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर झाली. याच प्रक्रियेत भूपती याची तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून निवड झाल्याचं कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितलं.
पण भूपती याच्या या नियुक्तीला मोठा विरोध झाला आहे. त्याला नेमक्या कुठल्या पात्रतेवर समन्वयक म्हणून निवडलं गेलं, याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाने करावा, अशी मागणी जन संघर्ष समितीने केली आहे. गडचिरोलीत चार दशकं दहशत माजवणारा, शेकडो सामान्य आदिवासींच्या हत्येला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असलेला आणि ज्याच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत, अशा हिंसक भूपतीला ग्रामसभांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कशी दिली जाऊ शकते, असा सवाल जन संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी विचारला आहे.
माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य आणि सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती हा नक्षल चळवळीतला बुद्धिजीवी मानला जातो. 2 नोव्हेंबर 1980 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मोयाबिनपेठा इथे सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली होती, ज्यात तत्कालीन सिरपूर दलमचा कमांडर पेद्दी शंकर मारला गेला होता. त्याचवेळी माओवाद्यांविरोधातला पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचाजवळच्या अमरादी गावात माओवाद्यांनी पहिल्यांदा एका सामान्य माणसावर हल्ला केला होता, तेव्हा तिथले शिक्षक राजू मास्तर यांचा उजवा हात माओवाद्यांनी कापला होता.