'ट्रॉफी चोर' मोहसीन नक्वींचे दिवस भरले? ACC अध्यक्षपदावरून हकालपट्टी निश्चित; 'या' दिवशी संपणार कार्यकाळ?
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर, त्यांच्या ACC अध्यक्षपदाची उलटगिणती सुरू झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या 'ट्रॉफी चोर' हा शब्द ऐकला की एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी. भारतीय संघाच्या दोन महत्त्वाच्या आशिया कप ट्रॉफी बेकायदेशीरपणे स्वतःकडे ठेवल्यामुळे नक्वी सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार टीकेचे धनी ठरले आहेत. पण आता क्रिकेट वर्तुळातून मिळणाऱ्या माहितीनुसार, नक्वींची ACC अध्यक्षपदावरून हकालपट्टी जवळपास निश्चित मानली जात असून त्यांच्या कार्यकाळाची उलटगिणती सुरू झाल्याचं बोललं जातंय.
भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे. आशिया कप २०२६ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक मोठा निर्णय घेतला, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायलाच नकार दिला. हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. यापूर्वी २०२५ च्या पुरुष आशिया चषक स्पर्धेतही भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने मोहसिन नक्वींकडून चषक घेण्यास नकार दिला होता. आता महिला संघानेही तेच पाऊल उचललं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन करणंही बंद केलं आहे.
एशियन क्रिकेट कौन्सिलच्या नियमांनुसार अध्यक्षपद हे आशियाई देशांमध्ये आलटून-पालटून दिलं जातं, म्हणजे हे पद कायमचं एका देशाकडे राहत नाही, ठरलेल्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींकडे फिरत राहतं. नक्वींचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या आगामी बैठकीत नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि ACC मधल्या इतर सदस्य देशांचाही नक्वींच्या कामाच्या पद्धतीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. रोटेशन धोरणानुसार आता पुढचं ACC अध्यक्षपद श्रीलंका किंवा बांगलादेशच्या प्रतिनिधीकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
नेमका वाद काय आहे, हे समजून घ्यायचं झालं तर, आशिया चषकातल्या शानदार विजयानंतर भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारायला आणि नक्वींच्या हातून सन्मान घ्यायलाच नकार दिला होता. या राजकीय आणि क्रिकेटच्या वादात नक्वींनी भारतीय संघाच्या दोन ट्रॉफी स्वतःकडेच ठेवल्या आहेत, म्हणजे विजयानंतरही त्या ट्रॉफी अजून भारतीय संघाच्या हातात पोहोचलेल्या नाहीत. क्रीडा वर्तुळात या कृतीला अत्यंत असभ्य आणि खिलाडूवृत्तीच्या विरोधात मानलं जातं आहे, आणि त्यामुळेच त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ट्रॉफी चोर' अशी टीका होते आहे. या सगळ्या घटनांमुळे नक्वींच्या अध्यक्षपदाभोवतीचा वादाचा वेढा अधिकच घट्ट होत चालला आहे, आणि क्रिकेट वर्तुळातली चर्चा आता त्यांच्या पदावरून जाण्याच्या दिशेकडे झुकलेली दिसत आहे.